बालविवाह रोखण्यासाठी अभियान
By Admin | Updated: October 16, 2014 00:25 IST2014-10-16T00:25:14+5:302014-10-16T00:25:14+5:30
वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी आणि बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यासाठी नवे अभियान सुरू होत आहे.

बालविवाह रोखण्यासाठी अभियान
मुंबई: वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी आणि बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यासाठी नवे अभियान सुरू होत आहे. ‘चाइल्ड राइट्स अॅण्ड यू’ संस्थेने पुढाकार घेऊन यासाठी समाजातील सर्व स्तरांवर चळवळ उभारण्याचे ठरविले आहे. यासाठी विविध पातळ्यांवर कार्य करणारी सक्षम यंत्रणा समाजातून तयार होईल, असा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे.
बालविवाह ही प्रथा चुकीची आहे. यामुळे लहानग्यांचे बालपण खुंटते. ही प्रथा बंद करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहीम हाती घेण्याचे संस्थेने ठरविले आहे. या अभियानांतर्गत सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी आणि कॉर्पोरेट सेक्टर्समधील कर्मचाऱ्यांनाही यात सहभागी करण्यात येणार आहे. याविषयी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुलींच्या बालविवाहात वाढ झाली आहे.
या सर्वेक्षणानुसार, जगामध्ये ७२० दशलक्ष मुलींचे लहान वयातच विवाह झाले आहेत. यापैकी २४० दशलक्ष बालविवाह हे भारतामध्येच झाले आहेत, अशी धक्कादायक बाबही यातून समोर आली आहे. यामध्ये या लहान मुलींचे लग्न हे त्यांच्याहून मोठ्या माणसांबरोबर होते हेही स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)