आगरी-कोळी समाजासाठी बोरीवलीत होणार भवन
By Admin | Updated: August 26, 2014 02:00 IST2014-08-26T02:00:29+5:302014-08-26T02:00:29+5:30
मुंबईत आगरी-कोळी समाजाचे भवन बांधण्याची मागणी अखेर तीन वर्षांनंतर मंजूर झाली आहे़

आगरी-कोळी समाजासाठी बोरीवलीत होणार भवन
मुंबई : मुंबईत आगरी-कोळी समाजाचे भवन बांधण्याची मागणी अखेर तीन वर्षांनंतर मंजूर झाली आहे़ विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावरच भूमिपुत्रांना न्याय मिळाल्यामुळे सत्ताधाऱ्यांची कॉलर मात्र टाइट झाली आहे़ त्यानुसार आगरी-कोळी समाज मोठ्या प्रमाणात असलेल्या बोरीवलीत असे भवन उभारून ही सुवर्णसंधी कॅच करण्याची तयारी शिवसेना-भाजपा युतीने केली आहे़
मुंबईचे भूमिपुत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या कोळी समाजासाठी भवन बांधण्याची मागणी २०१० मध्ये तत्कालीन नगरसेवक विलास चावरी यांनी केली होती़ ही मागणी तीन वर्षांनंतर प्रशासनाने मंजूर केली आहे़ त्यानुसार बोरीवली पश्चिम येथील एक्सर गाव येथील भूखंड निश्चित करण्यात येत आहे़ हे भवन बांधण्यासाठी अपेक्षित खर्चाचा अंदाज घेण्यात येत आहे़ त्याचबरोबर या भवनचा आराखडाही तयार करण्यात येत आहे़ त्यानंतरच भवन बांधण्याच्या कामाला सुरुवात होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले़ यासाठी काही वेळ असला तरी आतापासूनच याचे श्रेय खिशात घालण्याची तयारी शिवसेनेने केली आहे़
भूमिपुत्रांना हक्क मिळवून देणे हा शिवसेनेचा निवडणुकीतील महत्त्वाचा अजेंडा राहिला आहे़ आगरी-कोळी समाजाचा आकडा मुंबईत मोठा आहे़ असे भवन बांधण्याची मागणी कोळी समाजाकडून होत होती़ त्यानुसार विलास चावरी यांनी हा प्रस्ताव गटनेत्यांपुढे मांडला होता़ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास काही दिवस उरले असतानाच ही घोषणा करून याचे श्रेय खिशात घालण्याचे काम महापौर सुनील प्रभू यांनी आज केले़.या भवनात कोळी-आगरी समाजासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील़ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे या समाजाचा वारसा व महती भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)