Join us  

विक्रोळी येथे इमारत कोसळून एक जण ठार, तर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 1:08 PM

मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून विक्रोळीत इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे विक्रोळीत दरडही कोसळली असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, दि. 30 - मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून विक्रोळीत इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीच्या वर्षानगर भागातील ही इमारत आहे. दोन मजली इमारत कोसळल्याने एक जण ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे विक्रोळीत दरडही कोसळली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीमधील सुर्यानगर येथे ही दरड कोसळली आहे.  . 

दरम्यान, आज मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहील असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. अनेक सखल भागात अद्यापही पाणी तुंबलेले आहे. जेथे अशी धोकादायक ठिकाणे आहेत, तेथे एनडीआरएफचे जवान लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. एकंदरीतच मंगळवारी मुंबईकरांना झोडपून काढलेला पाऊस बुधवारीही मुंबईकरांना धडकीच भरविणार असल्याचे चित्र असून नेहमी धावणारी मुंबई संथगतीने सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मुंबई आता हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना घरी पोहोचताच आलं नाही. पाऊस रौद्र रुप धारण करत असल्याचं लक्षात येताच अनेकांनी ऑफिसमधून लवकर घरी जाणं पसंद केलं. मात्र पाऊस इतका मुसळधार सुरु होता की, स्टेशनला पोहोचल्यानंतर रेल्वे ठप्प असल्याने तिथेच रात्र घालवावी लागली. या पावसामध्ये मुंबईकरांचं पोट भरणारे डबेवालेही अडकून पडले होते. दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून धावणा-या मुंबईकराचं पोट भरण्याचं काम करणा-या डबेवाल्यांना संपुर्ण रात्र लोकल ट्रेनमध्येच घालवावी लागली. त्यामुळे आज डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.

मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने डबेवाले ठिकठिकाणी अडकून पडल्याने डबे पोहोचवणं शक्य झालं नव्हतं. अडकून पडलेल्या डबेवाल्यांनी संपुर्ण रात्र लोकलच्या डब्यात घालवली. काल दिवसभर आणि संपुर्ण रात्रभर डबेवाले विविध स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये अडकुन पडले होते. सोबत जेवणाचे डबे असल्यामुळे त्यांनी संपुर्ण रात्र लोकलच्या लगेज कंपार्टमेंट बसून काढली. रिकामी डबेच अद्याप घरी पोहचू शकले नाहीत. त्यामुळे आज मुंबईत डबे पोहचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशन प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे. 

मुंबईत मंगळवारी धुमाकूळ घातल्यानंतर पावसाने आज विश्रांती घेतली आहे. मुंबई पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही पाणी भरलेलं असून ओसरायला वेळ लागत आहे. अनेक कार्यालायांनी आजही सुट्टी दिली असल्याने नेहमी रस्त्यांवर असणारी वाहनांची गर्दी कमी असून रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे. दरम्यान रेल्वे वाहतूकही हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक व्यवस्थित सुरु असून मध्य आणि हार्बर रेल्वे हळूहळू पुर्वपदावर येत आहे. 

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकारमुंबई महानगरपालिका