ब्रिगेड कॉल घोषित झाला; आणि...
By Admin | Updated: May 11, 2015 03:45 IST2015-05-11T03:45:16+5:302015-05-11T03:45:16+5:30
काळबादेवी येथील गोकूळ इमारतीला लागलेल्या आगीची प्रथमत: १ नंबर आणि नंतर २ नंबरची वर्दी आल्याने एवढ्यावरच सारेकाही थांबेल, असा विश्वास अग्निशमन दलाच्या जवानांना होता.
ब्रिगेड कॉल घोषित झाला; आणि...
मुंबई : काळबादेवी येथील गोकूळ इमारतीला लागलेल्या आगीची प्रथमत: १ नंबर आणि नंतर २ नंबरची वर्दी आल्याने एवढ्यावरच सारेकाही थांबेल, असा विश्वास अग्निशमन दलाच्या जवानांना होता. मात्र सायंकाळी लागलेली आग विझविता-विझविता भस्मसात झालेली इमारत पत्त्यासारखी कोसळली आणि या वेळी घोषित झालेल्या ब्रिगेड कॉलने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला गोकूळ निवास इमारतीच्या मीटर बॉक्सला आग लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. त्यांनी ही माहिती महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला दिली. त्याचवेळी येथे बेस्ट आणि पोलीस आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ही माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष आणि बेस्टला कळविण्यात आली. शिवाय मलबार हिल जलाशय, विभागीय नियंत्रण कक्ष, सहायक आयुक्त, उपायुक्त, घटनास्थळापासून नजीकच्या रुग्णालयांच्या अपघात विभागांना माहिती देत मदत धाडण्यात आली.
अग्निशमन नियंत्रण कक्षामार्फत ब्रिगेड वर्दीची आग घोषित झाल्यानंतर घटनास्थळी नागरी संरक्षण दल, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एचपीसीएल, बीपीसीएल, एमआयडीसी, ठाणे महापालिका, नौदल, मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीकडून अतिरिक्त फायर इंजिनची व्यवस्था करण्यात आली; तसेच शहर विभागातील जेसीबी, डम्पर्स धाडण्यात आले.
आग विझविण्याचे काम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात सुनील नेसरीकर, सुधीर अमिन, एस.डब्लू. राणे आणि एम.एम. देसाई आत अडकले. सायंकाळी ७.०८ वाजता नेसरीकर यांची सुटका करून त्यांना मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर रात्री ८.०८ वाजता अमिन यांना बाहेर काढून मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...पण, काळाने झडप घातलीच!
च्आग विझविण्याचे काम सुरू असताना इमारतीचा भाग कोसळतच होता. त्याचवेळी राणे आणि देसाई आतमध्ये अडकले होते. घटनास्थळी एनडीआरफच्या तुकडीसही पाचारण करण्यात आले.
च्रात्री ११.४५ वाजता अग्निशमन नियंत्रण कक्षाकडून आपत्कालीन कक्षाला आग आटोक्यात आल्याची माहिती देण्यात आली.
च्शिवाय इमारतीच्या दोन भिंती शिल्लक असून, इतर सर्व भाग कोसळल्याचेही सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात आत अडकलेले राणे आणि देसाई या दोन जवानांवर काळाने घाला घातला होता.