वेळीच मदत न मिळाल्याने दोघींचा मृत्यू
By Admin | Updated: June 30, 2015 01:21 IST2015-06-30T01:21:15+5:302015-06-30T01:21:15+5:30
कार्यालयातून घरी परतणाऱ्या दोन तरुणींना बेस्ट बसने धडक दिल्याची घटना शनिवारी बीकेसी येथे घडली होती. यामध्ये दोन्ही तरुणींचा जागीच मृत्यू झाला

वेळीच मदत न मिळाल्याने दोघींचा मृत्यू
मुंबई : कार्यालयातून घरी परतणाऱ्या दोन तरुणींना बेस्ट बसने धडक दिल्याची घटना शनिवारी बीकेसी येथे घडली होती. यामध्ये दोन्ही तरुणींचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातामध्ये बसचालकाचीच चूक असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र या तरुणींना वेळीच मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया एका पादचाऱ्याने दिली आहे.
चेंबूर येथे राहणारी टीना मोटवानी (२७) आणि भांडुप येथे राहणारी संध्या कोठारी (२६) या दोघीही बीकेसी परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला होत्या. शनिवारी अर्ध्या दिवसाचे काम संपवून खरेदीसाठी वांद्र्याला निघाल्या होत्या. तेव्हा सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरून चेंबूरच्या दिशेने येत असताना बीकेसीतील सिटी बँक सिग्नलजवळ भरधाव वेगात ३१० नंबरच्या डबल डेकर बेस्ट बसने त्यांना धडक दिली. बस सिग्नलवर वळण घेत असताना बेस्टच्या चाकाखाली येऊन दोघीही गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर बेस्ट चालकाने पळ काढल्याने बराच वेळ या दोघी तरुणी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मात्र कोणत्याही वाहनचालकाने आाणि पादचाऱ्याने या तरुणींना रुग्णालयात दाखल करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे बराच वेळ या तरुणी रस्त्यालगतच पडून होत्या. वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.
त्यानंतर अर्ध्या तासाने बीकेसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाला. अपघातावेळी स्कुटी चालवत असलेल्या टीनाने हेल्मेट घातले नव्हते. मात्र या अपघाताला सर्वस्वी बेस्ट चालकच जबाबदार असून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातूनदेखील पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)