Join us  

Anandrao Adsul: शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना धक्का! ED कारवाईविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 6:31 PM

Anandrao Adsul: रितसर अटकपूर्व जामीनासाठी पीएमएलए न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहे. 

मुंबई: सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाई केली असून, अडसुळ यांच्या काही ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणीत दाखल ईसीआयआर रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी करत आनंदराव अडसुळांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अडसुळ यांना दिलासा देण्यास नकार दिला असून, रितसर अटकपूर्व जामीनासाठी पीएमएलए न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहे. 

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ सिटी को.ऑ. बँकेचे अध्यक्ष असताना सुमारे ९०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ईडी अधिकार्‍यांनी २७ सप्टेंबर रोजी अडसूळ यांच्या मुंबईतील राहत्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकून चौकशी सुरू केली. यानंतर अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना गोरेगावच्या लाइफलाइन केअर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना तिथून जवळच्याच एसआसव्ही रूग्णालयात हलवण्यात आले. यानंतर अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेत दिलासा देण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अडसूळ यांना दिलासा देण्यास नकार दिला. 

अडसूळांची प्रकृती ठणठणीत असल्यावर ईडी ठाम

ईडीने अद्याप आपल्याला याप्रकरणी दाखल ईसीआयआरची कॉपी दिलेली नाही आणि ती देण्यास आम्ही बांधिल नाही, अशी ठाम भूमिका तपास यंत्रणेच्यावतीने एएसजी अनिल सिंह यांनी उच्च न्यायालयात घेतली. तसेच अडसूळ हे केवळ नाटक करत असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा ईडीच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. लोकप्रतिनिधी राहिलेले अडसूळ जर तपासकामात अडथळा आणत असतील तर तपास कसा करणार, अशी विचारणा एएसजी अनिल सिंह यांनी उपस्थित करत अडसूळ यांच्या याचिकेला जोरदार विरोध केला. तर ईडीने केवळ राजकीय दबावातून ही कारवाई सुरू केल्याचा आरोप अडसूळ यांच्याकडून करण्यात आला असून, याप्रकरणात आपणच मूळ तक्रारदार होतो, तेव्हा आपल्यालाच आरोपी कसे बनवण्यात येईल, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. 

दरम्यान, अडसूळ यांच्यावतीने बाजू मांडत असलेल्या वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले की, बँकेच्या ९०० कोटी रूपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराशी अडसूळ यांचा थेट संबंध नाही. केवळ राजकीय प्रतिस्पर्ध्याच्याविरोधात अडसुळ यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राची तक्रार  केल्यानंतरच राजकीय सुडबुद्धीने ही खोटी तक्रार करण्यात आली आहे. तसेच अडसुळ यांची प्रकृती वयोमानानुसार ढासळल्याने त्यांना रूगणलयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णालबाहेर ईडीचे अधिकारी सशस्त्र पाहारा देत अडसुळ बाहेर पडायचीच वाट पाहात आहेत. याच धर्तीवर त्यांना ईडीच्या कारवाईपासून तूर्तास दिलासा द्यावा, अशी विनंती केली.  

टॅग्स :आनंदराव अडसूळउच्च न्यायालयअंमलबजावणी संचालनालयशिवसेना