घनश्याम सोनारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांकडे मागील १३ वर्षांत एक लाख २२ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असून, सुमारे ७१ टक्क्यांची ही घट नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळांच्या संख्येतही घट झाली आहे. १३ वर्षांपूर्वी एक हजार २९५ शाळा होत्या, त्यात घट होऊन फक्त एक हजार ११८ शाळा राहिल्या आहेत.
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू झाल्यानंतर प्रत्येक ६ ते १४ वयोगटांतील बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याची हमी आहे. त्यामुळे विद्यार्थी वाढणे अपेक्षित होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे उघडकीस आले आहे.
२०१२-१३ मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये चार लाख ३२ हजार ७४४ विद्यार्थी होते. मात्र, २०२४-२५ मध्ये ही संख्या तीन लाख १० हजार ४२६ पर्यंत घटल्याची बाब माहिती अधिकारातून मिळविलेल्या तपशीलात उघड झाली आहे.
दर्जेदार शिक्षणाचा अभाव- विद्यार्थ्यांची घट वर्षानुवर्षे सातत्याने सुरू असून, शिक्षकांची अपुरी संख्या, जोड वर्ग आणि दर्जेदार शिक्षणाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. - २०१३-१४ मध्ये एक हजार २९५ शाळा आणि चार लाख सात हजार ४४२ विद्यार्थी होते, तर २०२४-२५ मध्ये शाळांची संख्या एक हजार ११८ आणि विद्यार्थ्यांची - संख्या तीन लाख २८ हजार ६०२ इतकी झाली आहे.
‘आरटीई’च्या अंमलबजावणीबाबत प्रश्नमहापालिकेने विविध उपक्रम, स्मार्ट क्लासरूम, स्कॉलरशिप आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राबविले असले तरी पालकांचा ओढा खासगी शाळांकडेच अधिक दिसतो. त्यामुळे मोफत शिक्षणाच्या अधिकाराच्या अंमलबजावणीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे शिक्षण तज्ज्ञ अरविंद वैद्य म्हणाले.