Join us  

"अर्णब गोस्वामींना महात्मा गांधींप्रमाणेच त्रास दिला जातोय, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 2:25 PM

arnab goswami : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब हे भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील आणि ते प्रसारमाध्यमांचे चेहरामोहरा बदलून टाकतील असे मत संबित पात्रा यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देअर्णब यांना कोणीच काही नुकसान पोहचवण्याची हिंमत करु शकत नाही, असे संबित पात्रा म्हणाले.

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित यांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची तुलना महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांच्याशी केली. रिपब्लिक टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान संबित पात्रा बोलत होते. यावेळी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्याप्रमाणे अर्णब यांनाही त्रास सहन करावा लागत असून भविष्यात आपल्याला अर्णब अगदी वेगळ्या स्वरुपात दिसतील, असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे. 

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब हे भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील आणि ते प्रसारमाध्यमांचे चेहरामोहरा बदलून टाकतील असे मतही संबित पात्रा यांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर, अर्णब यांना न्याय नक्कीच मिळेल. सगळ्याच गोष्टी टीव्हीवर सांगता येत नाहीत. भारतीय संविधानावर विश्वास ठेवा. मी भाजपावर किंवा सरकारवर विश्वास ठेवा, असे सांगत नाही. कारण या दोन्ही गोष्टीही संविधानानुसारच काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे अर्णब यांना कोणीच काही नुकसान पोहचवण्याची हिंमत करु शकत नाही, असे संबित पात्रा म्हणाले.

अर्णब यांना सध्या झालेली अटक ही त्यांच्या आयु्ष्याला वेगळी कलाटणी देईल, असे संबित पात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, "अटकेची घटना अर्णब यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल असा माझा अंदाज आहे. या पुढे मी अर्णब यांना भारतीय प्रसारमाध्यमांचा नेल्सन मंडेला म्हणेल. तो भारतीय प्रसारमाध्यमांना कायमचा बदलून टाकेल असा मला विश्वास आहे. ब्रिटिशांनी गांधींना चालू ट्रेनमधून बाहेर धक्का दिल्यानंतर ते महात्मा गांधी झाले. या घटनेनंततर त्यांनी लढा सुरु केला आणि ते पुढे खूप मोठे नेते झाले. त्यांना जो त्रास व्हायला नको होता तसा त्रास देण्यात आला. तशाच पद्धतीचा त्रास सध्या अर्णब यांना दिला जात आहे. मला सर्व भारतीयांना सांगायचे आहे की, आपल्याला लवकरच पूर्णपणे बदलेले वेगळे अर्णब पहायला मिळतील."

याचबरोबर, अर्णब यांनी अनेक प्रकरणांबद्दल आवाज उठवल्याने त्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा म्हणाले, "उशिरा दिलेला न्याय हा अन्यायच असतो असं सांगत मी हात जोडून न्यायलयातील मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्व प्रकारे दोषी ठरलेल्या दहशतवाद्यासाठी रात्री न्यायलयाचे कामकाज केलं आहे. याकुब मेननसारख्या व्यक्तीसाठीही न्यायलये रात्री उघडली. अर्णबचा दोष काय होता, तर त्यांनी पालघरमधील साधुंसाठी न्यायाची मागणी केली. त्यांना एका अभिनेत्याला (सुशात सिंह राजपूत) न्याय मिळवून द्यायचा होता, त्यांना अंमलीपदार्थ मुक्त भारत हवा होता. त्यांनी काही राजकारण्यांची नाव घेतली. त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांना हे सहन करावं लागत आहे. याबद्दल खेद आहे. मात्र भारत आता जागृक देश आहे आणि भारत कोणासमोरही झुकणार नाही," असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :अर्णब गोस्वामीसंबित पात्रा