Join us  

'त्या' विधानानं भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो- राम कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 8:07 AM

लग्नासाठी मुली पळवण्याच्या विधानावर भाजपा आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया

मुंबई: लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. माझं विधान अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचं खापर विरोधकांवर फोडलं आहे. 

सोमवारी दहिहंडी उत्सवावेळी उपस्थित तरुणांशी संवाद साधताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. विरोधकांसह सर्वसामान्यांनीदेखील राम कदम यांच्यावर तोंडसुख घेतलं. तरीही आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं कदम यांनी काल दुपारी म्हटलं होतं. मात्र काल रात्री राम कदम यांनी ट्विटरवरुन त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला. 'कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. विरोधकांनी दुसऱ्या दिवशी 54 सेकंदांचं अर्धवट विधान पसरवून संभ्रम निर्माण केला. आदल्या दिवशी दुपारी पत्रकार उपस्थित होते. मात्र त्यांनी आक्षेप घेतला नाही. कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकलं होतं', असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते राम कदम?भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

टॅग्स :राम कदमदही हंडीभाजपा