भाजपाने रचला इतिहास

By Admin | Updated: May 17, 2014 02:30 IST2014-05-17T02:30:49+5:302014-05-17T02:30:49+5:30

उत्तर भारतीयांचाच चेहरा अशी बनलेली काँग्रेसची प्रतिमा, त्यामुळे इतर भाषिक समाजांकडे झालेले दुर्लक्ष, आमदार म्हणून गोपाळ शेट्टींनी केलेली कामे आणि यापेक्षाही असलेली मोदी लाट.

BJP created history | भाजपाने रचला इतिहास

भाजपाने रचला इतिहास

 उत्तर भारतीयांचाच चेहरा अशी बनलेली काँग्रेसची प्रतिमा, त्यामुळे इतर भाषिक समाजांकडे झालेले दुर्लक्ष, आमदार म्हणून गोपाळ शेट्टींनी केलेली कामे आणि यापेक्षाही असलेली मोदी लाट. या सर्व कारणांचा फायदा भाजपाला यंदा उत्तर मुंबईत लोकसभा निवडणुकीत झाला. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी पराभव केला आणि एक इतिहास रचला. २00४ सालापासून सलग दोन वेळा उत्तर मुंबईत काँग्रेसचे वर्चस्व होते. २00४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदा याने काँग्रेसमधून निवडणूक लढवताना भाजपाचे उमेदवार राम नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर २00९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राम नाईक यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे उत्तर मुंबई हा काँग्रेसचा गड मानला जात होता. मराठी, गुजराती भाषिकांबरोबरच उत्तर भारतीयांचे वर्चस्व हे काँग्रेसचे बलस्थान होते. त्यामुळे मागील दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही इतर भाषिकांबरोबरच उत्तर भारतीयांचीही मते मोठ्या प्रमाणात मिळतील, अशी आशा काँग्रेसला होती. त्यामुळे फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या काँग्रेसला त्याचाच फटका यंदाच्या निवडणुकीत बसला आणि काँग्रेसचे उमेदवार असलेले निरुपम यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यंदा भाजपाचे गोपाळ शेट्टी यांना ६ लाख ६४ हजार ४ तर काँग्रेसचे संजय निरुपम यांना २ लाख १७ हजार ४२२ मते मिळाली आणि तब्बल ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी निरुपम यांचा पराभव झाला.

Web Title: BJP created history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.