बविआचे चार नगरसेवक बिनविरोध
By Admin | Updated: June 1, 2015 22:48 IST2015-06-01T22:48:42+5:302015-06-01T22:48:42+5:30
महानगरपालिकेच्या ११५ जागांपैकी बहुजन विकास आघाडीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने केवळ १११ उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे.

बविआचे चार नगरसेवक बिनविरोध
दीपक मोहिते, वसई
महानगरपालिकेच्या ११५ जागांपैकी बहुजन विकास आघाडीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने केवळ १११ उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे. आता ६ लाख ८७ हजार ४३९ मतदार १११ नगरसेवकांना निवडणार आहेत. चार नगरसेवक बिनविरोध विजयी झाल्याने बहुजन विकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर, अन्य राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर नाराज आहेत. दुसरीकडे निवडणूक यंत्रणेमधील सावळ्या गोंधळामुळे राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांसह माध्यमांच्या प्रतिनिधींनाही त्रास सहन करावा लागत आहे. दहा ठिकाणी केंद्रे स्थापन करण्यात आलीत. मात्र कामकाजामध्ये सुसूत्रतेचा अभाव आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी विविध पक्षांकडून करण्यात आली आहे.
सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक डमी तसेच इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. किती जणांनी माघार घेतली याबाबतची माहिती उशीरापर्यंत निवडणूक मुख्य कार्यालयाकडे आली नसल्याने नेमकी आकडेवारी मिळू शकली नाही. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना तिकिट मिळाल्याचे संकेत मिळाल्यानंतर प्रचाराला सुरूवात झाली. प्रत्येक प्रभागामध्ये सरासरी साडेसात ते आठ हजार मतदार आहेत. या सर्वांची भेट घेणे तसेच चौकसभा लावणे आदी कामांना आता वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरताना काही उमेदवारांनी चुका केल्याने त्यांचे अर्ज फेटाळले गेले. विरार येथे युतीच्या दोन उमेदवारांनी सूचक व अनुमोदक देण्यासंदर्भात चुक केल्याने त्यांना निवडणूक लढविण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
मतदारयादीतील गोंधळामुळे विरोधीपक्षामध्ये संतापाचे वातावरण असून याप्रकरणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रचारामध्ये विकासकामांचा मुद्या चर्चेला येण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली विकासकामे मतदारांसमोर मांडण्याचा सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न आहे. तर, दुसरीकडे विरोधक प्रलंबित विकासकामे तसेच विकासकामांतील गैरप्रकार यावर आपल्या प्रचाराचा भर ठेवतील, असा अंदाज आहे. काही अपवाद वगळता अनेक प्रभागामध्ये दुरंगी व तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. ८ ते १० राजकीय पक्ष रिंगणात असल्याने यंदा उमेदवारांची संख्याही अधिक आहे.