‘नो एन्ट्री’त बाइकस्वारांची ‘एन्ट्री’
By Admin | Updated: February 5, 2015 00:49 IST2015-02-05T00:49:42+5:302015-02-05T00:49:42+5:30
जे.जे. पुलावर काही बाइकस्वारांच्या हलगर्जीपणामुळे होणारे अपघात पाहता या पुलावरून बाइकस्वारांसाठी ‘नो एन्ट्री’ करण्यात आली.

‘नो एन्ट्री’त बाइकस्वारांची ‘एन्ट्री’
मुंबई : जे.जे. पुलावर काही बाइकस्वारांच्या हलगर्जीपणामुळे होणारे अपघात पाहता या पुलावरून बाइकस्वारांसाठी ‘नो एन्ट्री’ करण्यात आली. नो एन्ट्रीनंतरही जवळपास साडेचार वर्षांत १७ हजार १0६ बाइकस्वारांनी या पुलावरून जाण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. नो एन्ट्रीत जाणाऱ्या बाइकस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईतील भागात मोठ्या प्रमाणात असणारी रहिवासी संकुले आणि कार्यालये पाहता चार चाकी चालक आणि बाइकस्वारांना जे.जे. पूल सोयीस्कर पडत होता. मात्र काही बाइकस्वारांच्या हलगर्जीपणामुळे होणारे अपघात पाहता १ एप्रिल २0१0 पासून जे.जे. पुलावरून बाइकस्वारांना जाण्यास बंदी घालण्यात आली. परंतु जे.जे. पुलाच्या खालच्या बाजूने गर्दीच्या वेळेत जाण्याचा प्रयत्न केल्यास बाइकस्वारांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. तर याच पुलाचा वापर केल्यास अवघ्या पाच मिनिटांत प्रवास होतो. जे.जे. पुलावरून जाण्यास वाहतूक पोलिसांनी नो एन्ट्री घातलेली असतानाही बाइकस्वार या पुलाचा वापर करतात आणि वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. आतापर्यंत नो एन्ट्रीत घुसून या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या १७ हजार १0६ बाइकस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २0१0 ते २0१४ पर्यंत ही कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले. २0१0 मध्ये १ हजार ७९८ बाइकस्वारांवर कारवाई करण्यात आली. तर २0१४ मध्ये तब्बल ६ हजार २३0 बाइकस्वार नो एन्ट्रीत घुसले. ही कारवाई करूनही बाइकस्वारांचे पुलावरून जाणे काही बंद होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेकदा वाहतूक पोलिसांशी खटकेही उडतात, असे सूत्रांनी सांगितले. नो एन्ट्रीनंतरही पुलावरून जाणाऱ्या बाइकस्वारांची संख्या पाहता त्यांना गर्दीच्या वेळेत एन्ट्री दिल्यास प्रवास सुकर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्र्रतिनिधी)
जे.जे. पुलावर मोठ्या प्रमाणात बाइकस्वारांचे अपघात झाले आहेत. त्यामुळेच या पुलावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी योग्यच आहे. या पुलावर काही वळणे असून बाइकस्वारांकडून कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळेच अपघातांना तोंड द्यावे लागते.
- गणेश रेकुलवाड, पायधुनी वाहतूक विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक