भातसाचे पाणी शहापूरसाठी बंद
By Admin | Updated: July 16, 2014 00:10 IST2014-07-16T00:10:53+5:302014-07-16T00:10:53+5:30
धुक्यात दाटलेला रिमझिम पाऊस वगळता धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरविली आहे.

भातसाचे पाणी शहापूरसाठी बंद
भरत उबाळे, आसनगाव
धुक्यात दाटलेला रिमझिम पाऊस वगळता धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे भातसा धरणाच्या पाणीपातळीने मंगळवारी ९७६.१० दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेच्या खाली १६.७७ मीटरपर्यंत तळ गाठला. यामुळे स्थानिक गावांसाठी भातसा नदीला सोडण्यात येणारे पाणी गेल्या आठ दिवसांपासून रोखण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद झाल्याने नदीनेही तळ गाठायला सुरुवात केली आहे.
भातसा नदीवर अवलंबून असलेल्या ४२ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी २० गावांचा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद झाला आहे. भातसाची साठवण क्षमता ९७६.१० दशलक्ष घनमीटर असून, ९४२.१० दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा असतो. तर ०३४.०० द.ल.घ.मीटर मृतसाठा असतो. मृतसाठा मार्च अखेरीसच संपुष्टात आला. ३८८.५० चौ. कि.मी. पाणलोट क्षेत्र आहे. तेथील नाले उघडे पडले आहेत. तानसा, वैतरणा, विहार, तुळशी या धरणांच्या तुलनेत सर्वाधिक साठवण क्षमता असूनही भातसा धरणाने तळ गाठायला सुरुवात केल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे.