संशयातून बारबालाची हत्या
By Admin | Updated: June 9, 2015 01:41 IST2015-06-09T01:41:31+5:302015-06-09T01:41:31+5:30
दुसऱ्या इसमासोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयावरुन चेंबूर येथील मंजू वर्मा (२२) या बारबालेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

संशयातून बारबालाची हत्या
मुंबई : दुसऱ्या इसमासोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयावरुन चेंबूर येथील मंजू वर्मा (२२) या बारबालेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात फिरोज खान (३६) याला अटक केली आहे.
मुळची राजस्थान येथे राहणारी मंजू पाच वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबईत दाखल झाली होती. सहा भावंडांसह आई-वडीलांची जबाबदारी तिच्यावर होती. चेंबूर कॅम्प परिसरातील एका बारमध्ये ती काम करत होती. त्याचवेळी तिची फिरोजसोबत ओळख झाली. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले. टेलरचे काम करणाऱ्या फिरोजने आपण व्यावसायिक असल्याचे सांगत तिला विवाहाची गळ घातली. त्यामुळे गेली दोन वर्ष त्यांच्यांमध्ये अनैतिक संबध होते. मात्र काही दिवसांतच फिरोज हा व्यासायिक नसून एक टेलर असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडले.
मंजूच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी आला असल्याचा संशय फिरोजच्या मनात होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा भांडणेही होत होती. ५ मे रोजी अंजू एका नातेवाईकाच्या विवाहासाठी राजस्थान येथे गेली होती. २५ मे रोजी पुन्हा मुंबईत परतली. मात्र मुंबई दाखल झाल्यापासून तिचा फोन लागत नसल्याने तिच्या आई-वडीलांना चिंता वाटू लागली. त्यामुळे तिच्या शोधात ते रविवारी चेंबूर येथे आले. आजू-बाजूला चौकशी केल्यानंतर आठ दिवसांपासून घराला कुलूप असल्याचे त्यांना समजले. मात्र घरातून मोठया प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता मंजू मृतावस्थेत आढळली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश देवडे यांनी एक पथक तयार करुन तपास सुरु केला. काही दिवसांपासून आरोपी तिच्या घरी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातच आरोपीचा मोबाईल नंबर मंजू राहत असलेल्या घरातील भिंतीवर पोलिसांना आढळूला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेत सोमवारी सकाळी त्याला चेंबूर परिसरातूनच अटक केली. (प्रतिनिधी)
तवा डोक्यात घालून केली हत्या
मंजू मुंबईत आल्याचे समजताच आरोपी २६ मे ला तिच्या घरी गेला. यावेळीही त्यांच्यात वाद झाला. याच रागातून आरोपीने मंजूच्या डोक्यात तवा घातला. त्यात ती गंभीर जखमी झाली आणि बेडवर कोसळली. यात तिचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपीने बाहेरुन घराला कुलूप लावून पळ काढला होता.