Join us
Daily Top 2Weekly Top 5

बालविकास विद्यामंदिर विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, रविंद्र वायकर यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 16:27 IST

 जोगेश्‍वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या, सूचना गृहनिर्माण राज्यमंत्री तसंच जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली आहे.

मुंबई -  जोगेश्‍वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या, सूचना गृहनिर्माण राज्यमंत्री तसंच जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार बचतगटाचे किचन होते का? याचीही तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. १३ डिसेंबर २०१७ रोजी जोगेश्‍वरी पुर्व, शामनगर येथील बालविकास विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत देण्यात आलेली खिचडी खाल्याने सुमारे ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या घटनेनंतर या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने कोकण तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार करण्यात आले. शनिवार सकाळी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी तातडीने बालविकास विद्यामंदिर शाळेला भेट दिली.

या घटनेनंतर दोन मुलांच्या पोटांतील अन्नाचे नमुने तसेच सातही डब्यातील खिचडीची नमुने घेण्यात आले आहेत. या अन्नामध्ये विष होते का? याची तपासणी करण्यासाठी शासनाच्या कालिना येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागानेही नमुने आपल्या प्रयोगशाळेत नेले आहेत. गोडाऊनमधील धान्याचे नमुनेही घेण्यात आल्याची माहिती, मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पांडुरंग पाटील यांनी राज्यमंत्री यांना दिली. या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.