जागरूक विद्यार्थ्यांना दिला न्याय
By Admin | Updated: May 28, 2014 01:21 IST2014-05-28T01:21:10+5:302014-05-28T01:21:10+5:30
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीने गेल्या १३ वर्षांत एक हजार ९५ जागरूक विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे

जागरूक विद्यार्थ्यांना दिला न्याय
तेजस वाघमारे, मुंबई - महाविद्यालयांकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क, परीक्षेतील गोंधळ आणि महाविद्यालयांकडून विनाकारण होणारी हेळसांड अशा विविध तक्रारींची दखल घेत मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीने गेल्या १३ वर्षांत एक हजार ९५ जागरूक विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे. महाविद्यालयाकडून अन्याय झाल्यानंतरही कोणाकडे दाद मागावी हे अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसते. अशा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यापीठ लवकरच समितीच्या कार्याबद्दल विशेष जनजागृती मोहीम राबविणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार मुंबई विद्यापीठात विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था आणि विविध विभागांमध्ये शिकत असणार्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण ही समिती करत आहे. महाविद्यालयाकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क, परीक्षेला बसू न देणे, निकालात गोंधळ किंवा महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार्या अपुर्या सेवा-सुविधा आदी विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल समितीमार्फत घेण्यात येते. विद्यार्थ्यांची तक्रार रीतसर समजून घेतल्यानंतर समिती संबंधित महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेकडून अभिप्राय मागवते. संबंधित संस्थेकडून अभिप्राय प्राप्त होताच त्याची प्रत विद्यार्थ्याला पाठविण्यात येते. या अभिप्रायावर विद्यार्थी असमाधानी असल्यास त्याच्या तक्रारीवर चर्चा करण्यासाठी समितीची बैठक बोलावण्यात येते. या बैठकीमध्ये संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थेच्या प्रतिनिधीची बाजू ऐकून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शिफारस केली जाते. गेल्या १३ वर्षांत विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे १ हजार ९५ तक्रारी दाखल झाल्या. या सर्व तक्रारी निकाली काढत विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे. विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीबाबत खूपच कमी विद्यार्थ्यांना माहिती असते. त्यामुळे समितीकडे कमी तक्रारी येतात. समितीची माहिती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी समितीमार्फत यंदापासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितसंंबंधांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विद्यार्थी तक्रार निवारण समिती हे एक सक्षम प्राधिकरण आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत समितीची माहिती पोहोचण्यासाठी प्रशासनामार्फत भविष्यात विशेष उपाययोजना राबविण्यात येतील, असे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी सांगितले.