Join us  

गोरेगावमध्ये निसर्गाचा आविष्कार; शुभ्र खळखळून वाहणारा धबधबा ठरतोय आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:58 PM

वलभट नदी उगम पावते तेथील निसर्गरम्य परिसर ना विकास क्षेत्र व संजय गांधी नॅशनल पार्क  परिसरात येतो. तरी तेथील वृक्ष संपदा जाणीवपूर्वक नष्ट होत असून येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा 1 व 2 समोरील डोंगरातील हिरवळ व पावसाळ्यात दिमाखात धो धो वाहणारा उपनगरातील एकमेव धबधबा आहे. शुक्रवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तर हा धबधबा व्हायला सुरुवात झाली आहे. गोरेगाव (पूर्व) रेल्वे स्थानकावरून 346 व 646 बसने नागरी निवारा 1 व 2 च्या शेवटच्या थांब्यावर उतरल्यावर समोर व म्हाडाच्या अथर्व इमारतीच्या मागील बाजूस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर उगम पावणाऱ्या वलभट नदीतून दरवर्षी पावसात हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो. पावसाळ्यात येथील धबधबा व्हायला सुरुवात झाली अशी खबर मिळताच दर शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी या धबधबचा आनंद लुटण्यासाठी डोंगर चढून पर्यटक येथे गर्दी करतात.

गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी येथील चार किमी डोंगरला मोठी आग लागली होती आणि या आगीचे लोण दूरवर पसरले होते.आगीचे शेकडो फोटो सोशल मिडीयावर व्हायरलं झाले होते. सुमारे 3 तासानंतर येथील आग विझवण्यात फायरब्रिगेडला यश आले. फायरब्रिगेडने या डोंगराला आग लावण्यात आल्याचा अहवाल दिला होता. तर पर्यावरण मंत्री रामदास कदम व स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी या डोंगरला भेट दिली होती.

धबधबा नामशेष होण्याची भीतीवलभट नदी उगम पावते तेथील निसर्गरम्य परिसर ना विकास क्षेत्र व संजय गांधी नॅशनल पार्क  परिसरात येतो. तरी तेथील वृक्ष संपदा जाणीवपूर्वक नष्ट होत असून येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे. येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आणि येथील धबधबा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विकासकाने येथे बांधकाम करून चक्क इन्फिनिटी आयटी पार्क डोंगरावरच उभारल्यामुळे येथील 30 ते 40 टक्के हा निसर्गाचा आविष्कार असलेला डोंगर आणि धबधबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा धबधबा भविष्यात नामशेष होण्याची भीती येथील पर्यावरण प्रेमी शरद मराठे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.

खळखळणारा धबधबा आणि वृक्ष वल्लीने नटलेली हिरवाई. दर वर्षी  डिसेंबर ते मे महिन्यात  येथील विकासकातर्फे वृक्षांवर घाला घालून संपुर्ण डोंगरमाळात आग लावून डोंगर बेचिराख केला जातो. सर्वत्र काजळी पसरून डोंगरमाळ काळाकुट्ट होऊन जातो. डोंगरमाळात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अनधिकृतपणे उत्खनन झालेले आहे ते खालून दिसत नाही ते वर डोंगरमाळाच्या माथ्यावर दिसते. त्याच बरोबर काँक्रीटच्या मुंबईचे दर्शन होते. पण पावसाच्या आगमनाने येथील निसर्ग पुन्हा बहरतो. राखेने काळाकुट्ट झालेला डोंगरमाळ पाऊस सुरू झाल्यावर पुन्हा हिरव्या गालिछाने हा डॉगर बहरतो. गोरेगाव मधील नागरी निवारा परिषद आणि म्हाडा वसाहती मागील नॅशनल पार्कच्या या डोंगरातील वन्य जीवन, वृक्ष वल्ली, औषधी वनस्पती नामशेष होत आहे अशी खंत साद प्रतिसादचे संस्थापक संदीप सावंत यांनी व्यक्त केला.

मुंबईतील नागरी वस्तीजवळ असलेला हा निसर्गाचा अविष्कार असलेला धबधबा वाचवायला हवा. पर्यावरण संवर्धनावर काम करणाऱ्या युवा स्वराज्य व साद प्रतिसाद संस्थेने येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आणि येथील धबधबा यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन  या  संस्थेने केले आहे.अधिक माहिती साठी ९८२१३०८४१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :पाणीमुंबई