मुंबई : ‘जुने संगीत आज मागे पडले आहे. मुलांची ऐकण्याची तऱ्हा सुधारून भारतीय संगीत पुन्हा पुढे आणण्याची गरज आहे. आपले जुने संगीत टिकवण्यासाठी अधिक हातभार लावला पाहिजे’, असे मत सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी शनिवारी व्यक्त केले. तर, ‘रेडिओवर कार्यक्रम सुरू असताना माणूस दिसत नाही, पण सचित्र दर्शन शब्दांमधून घडते. त्यामुळे रेडिओचे महत्त्व आजही अबाधित आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात १२ आशा रेडिओ पुरस्कार देण्यात आले.
संगीत नाटकावर संशोधनात्मक प्रबंध लिहिणारे गीतकार विश्वनाथ ओक यांना गायिका आशा भोसले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘आशा रेडिओ जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले गाणे
आशा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना गाणे म्हणण्याचा आग्रह धरला. त्यावर त्यांनी उपस्थितांसोबत ‘अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही...’ हे गाणे म्हटले. नंतर आशा यांनी शेलार यांना गाणे म्हणण्यास सांगितले असता, त्यांनी ‘माझा आवाज बघा’ असे म्हणत टाळण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांनी त्यावर ते जर ‘पिया अब तो आजा’ हे गाणे म्हणत असतील तर मी ‘मोनिका डार्लिंग म्हणेन’ अशी कोटी केली. त्यावर सभागृहात एकच हशा झाला. अखेर, आशाताईंच्या आग्रहामुळे शेलार यांनी ‘नाच रे मोरा, आंब्याचा वनात नाच’ गाणे म्हटले.
संवादाचे माध्यम
मी १९३३ साली पहिले गाणे म्हटले त्यावेळी १० वर्षांची होते. तेव्हा रेडिओ नसता तर तुमच्यासमोर नसते. रेडिओमुळे अनेक कलाकारांना ओळख मिळाली. समाजाच्या शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचणारे रेडिओ हे सशक्त माध्यम आहे, असे आशा भोसले म्हणाल्या.
रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवत आहेत. रेडिओ केवळ संगीत ऐकण्याचे साधन नाही, तर संवादाचेही माध्यम होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
रेडिओ जॉकींनी घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात आरजे सिद्धू, आरजे सपना भारती, आरजे अक्की, आरजे भूषण, आरजे ब्रजेश, आरजे अभिलाष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे समन्वयक हेनल मेहता हे होते.
तुमच्या जीवनात गाण्याचे स्थान काय? मुख्यमंत्री : गाणे माझ्यासाठी एक हिलिंग, स्ट्रेस बस्टर आहे. डिप्रेशन येते तेव्हा गाणी ऐकतो. सगळे प्रॉब्लेम विसरून वेगळ्या दुनियेत जातो.
रेडिओवर ऐकलेल्या गाण्याची राजकारणात मदत झाली? मुख्यमंत्री : २०१९ ला निवडून आलो, पण सरकार आले नाही. २०२२ ला आम्ही सरकार आणले. ‘वो सिकंदर भी दोस्तो कहलाता है, हारी बाजी को जितना...’ राजकारणात गाणी, रेडिओ महत्त्वाचे आहे.
तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या चार ओळी म्हणाल का? मुख्यमंत्री : रामदास आठवले घराण्याचा मी कवी आहे. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे... एक कविता लिहिली... तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसेना का अर्थ अनर्थ तर असतो.
अमृता यांनी कधी दबाब आणून गाणे लिहून घेतले आहे का? मुख्यमंत्री : दबाव आणून माझे गाणे म्हण असे मीच म्हणेन. माझे एक गाणे तिने गायले आहे. आमचे अरेंजमॅरेज. तिला डेडिकेट करावी अशी ९०ची खूप गाणी आहेत. ‘राहों में उनसे मुलाकात हो गई...’ हे त्यातल्या त्यात आवडते.
गाणी लिहिली पण गाण्यांवर पहिले प्रेम कधी जडले? मुख्यमंत्री : लहानपणापासूनच गाण्यांवर प्रेम आहे. गाणी लिहितो पण सुरात कधी गाऊ शकत नाही. आम्ही कोरसवाले आहोत.
पहिल्यांदा काय लिहिले ते आठवते का? मुख्यमंत्री : नाही. कॉलेजमध्ये कविता लिहिल्या, कवी संमेलनात जायचो. पण, लिहिलेल्या कविता कधी ठेवल्या नाहीत. राम जन्मभूमीवेळी प्रभू राम व शंकरावर गाणे लिहिले आहे.