अरुणाअस्त!
By Admin | Updated: May 19, 2015 02:20 IST2015-05-19T02:20:25+5:302015-05-19T02:20:25+5:30
केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अरुणा शानबाग यांनी अखेरचा श्वास घेतला आणि तब्बल ४२ वर्षांपासून मृत्यूसोबत सुरू असलेला एक प्रदीर्घ संघर्ष संपला.

अरुणाअस्त!
४२ वर्षांचा संघर्ष संपला : अरुणा शानबाग यांचे निधन
मुंबई : केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अरुणा शानबाग यांनी अखेरचा श्वास घेतला आणि तब्बल ४२ वर्षांपासून मृत्यूसोबत सुरू असलेला एक प्रदीर्घ संघर्ष संपला. त्यांच्या मृत्यूने जवळच्या नातलगांप्रमाणेच त्यांची ४२ वर्षे अहोरात्र सेवा करणारे केईएम रुग्णालय हळहळले, अस्वस्थ झाले.
अरुणा यांचा कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्या ६७ वर्षांच्या होत्या. भोईवाडा येथील स्मशानभूमीत सायंकाळी ५.३९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे नातेवाईकही हजर होते. त्यांना पाहून नर्स अस्वस्थ झाल्या. इतकी वर्षे अरुणा यांचे पालकत्व स्वीकारून त्यांचा सांभाळ केलेल्या केईएम रुग्णालयानेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले पाहिजेत यावर नर्स आग्रही होत्या. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आणि अरुणा यांच्या नातेवाइकांनी मिळून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. डॉ. सुपे व अरुणा यांचा भाचा विनायक नायक या दोघांनी अरुणावर अंत्यसंस्कार केले. भडाग्नी डॉ. सुपे यांनी दिला. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पालिका आयुक्त अजय मेहता, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक, अभिनेत्री स्मिता तांबे हे अरुणाच्या अंत्यदर्शनासाठी आले होते.
अरुणा शानबाग यांच्या दु:खद निधनामुळे शोक प्रकट करतो. त्यांचा वेदनादायक प्रवास पाहणे दु:खदायक होते. केईएमच्या परिचारिकांनी जे मानवतेचे दर्शन घडवले, त्याला मी सलाम करतो.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
इच्छामरणासाठी न्यायालयीन लढा!
गेली ४२ वर्षे मृत्यूशी झगडणाऱ्या केईएमच्या परिचारिका अरुणा यांच्या निधनाने पुन्हा इच्छामरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यात चांगली प्रकृती असून विशिष्ट अत्यावस्थ स्थितीत इच्छामरणाचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल. पुन्हा एकदा न्यायालयाने याविषयी सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
‘त्या’ दिवशी काय घडले ?
परळच्या केईएममध्ये १९७३ साली अरुणा शानबाग (२५) ही मुलगी परिचारिका म्हणून कार्यरत होती. २७ नोव्हेंबर १९७३ या दिवशी नेहमीप्रमाणे अरुणाची वॉर्डमधली ड्युटी संपल्यावर कपडे बदलण्यासाठी गेली.
वॉर्डबॉय सोहनलाल वाल्मिकी तिथेच होता. सोहनलालने कुत्र्याच्या गळ््यातल्या चेनने अरुणाचा गळा आवळला, तिच्यावर अत्याचार केले. चेनने घट्ट आवळल्याने तिच्या मेंदूतील काही भागाला रक्ताचा पुरवठा होऊ शकला नाही.
मेंदूतील या पेशी मृत झाल्या. यात तिची दृष्टी गेली होती. मृत्यूपर्यंत अरुणा वेजिटेटिव्ह स्टेटमध्येच होती.
केईएम हे एक कुटुंब आहे. त्याच कुटुंबातली अरूणा आज सोडून गेली. याचे दु:ख आहे. गेल्या ४२ वर्षांपासून रुग्णालयातच उपचार सुरू होते. यामुळे तिच्या आणि आमच्यात एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. आमच्यातल्या एका महिलेच्या बाबतीत अत्याचार होणे ही दुर्दैवी घटना होती. पण, सगळ््यांनी एकत्र येऊन तिला मदत केली. ही एक सांघिक भावना आहे. - डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय