Join us  

Arogya Vibhag Exam : आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय, उपसंचालकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 4:34 PM

Arogya Vibhag Exam : आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पद भरतीसाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तयारीबाबत आयुक्त एन. रामास्वामी यांनी काल व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.

ठळक मुद्देराज्यातील आरोग्य विभागाचे सर्व उपसंचालक, सह संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि परीक्षेची संबंधित अधिकारी आणि न्यासा कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मुंबई - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी यांनी याबाबत संबंधित उपसंचालक यांना कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या या परीक्षांबाबत सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. परीक्षेतील गोंधळ टाळण्यासाठी राज्य सरकारनं आरोग्य विभागातील उपसंचालक दर्जाच्या 8 अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पद भरतीसाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तयारीबाबत आयुक्त एन. रामास्वामी यांनी काल व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह राज्यातील आरोग्य विभागाचे सर्व उपसंचालक, सह संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि परीक्षेची संबंधित अधिकारी आणि न्यासा कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

परीक्षा केंद्र परिसरात सुरक्षा

एन. रामास्वामी यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी. अशी नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची यादी पाठवावी. प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करावी. परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू करण्यासाठी जिल्हा प्रशासनासाठी समन्वय ठेवून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी

जिल्हा शल्य चिकित्सक, उपसंचालक यांनी शाळेतील परीक्षा केंद्राची पाहणी करावी. परीक्षा घेताना कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी काळजी घ्यावी, अशाही सूचना रामास्वामी यांनी दिल्या.

आसन व्यवस्था, सुरक्षा पाहणी होणार

रिक्त अभियान संचालक सतीश पवार यांनी परीक्षा केंद्र म्हणून निश्चित केलेल्या शाळांना उपसंचालक, सहसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट द्यावी. शाळांतील आसन व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा याबाबत तयारी करुन घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

दिव्यांग उमेदवारांना सोयी मिळणार

संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार दिव्यांग उमेदवारांना सवलती दिल्या जातील, याबाबत काळजी घ्यावी. परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर पुरविण्यात यावे, असे सांगितले. 

टॅग्स :राजेश टोपेआरोग्यपरीक्षामुंबई