Join us  

अकरावी प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 6:24 PM

सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आसल्याचे शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी आज जाहीर केले.

मुंबई - अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे पार पडावी आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आसल्याचे शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी आज जाहीर केले. अकरावी प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर विहित कोट्यातील राखीव जागांवर करण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर तसेच एकूण प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी हे विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येणाऱ्या या भरारी पथकामध्ये विभाग स्तरावरील केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतील कोणतेही दोन सदस्य तसेच विभागातील अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी अथवा प्राचार्य, संबंधित शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण निरीक्षक यांचा या भरारी पथकामध्ये समावेश असणार आहे.