एपीएल कार्डधारक रेशनविना
By Admin | Updated: June 2, 2014 04:42 IST2014-06-02T04:42:16+5:302014-06-02T04:42:16+5:30
मोहोपाडा रसायनीतील एपीएल कार्डधारकांना गेल्या चार महिन्यांपासून रेशनवरील धान्यच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली

एपीएल कार्डधारक रेशनविना
मोहोपाडा-रसायनी : मोहोपाडा रसायनीतील एपीएल कार्डधारकांना गेल्या चार महिन्यांपासून रेशनवरील धान्यच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून धान्य न मिळण्याचे कोणतेही कारण ग्राहकांना देण्यात येत नसल्याने केशरी रेशनकार्डांची सवलत बंद होणार की काय अशी भीती ग्राहकांमध्ये पसरली आहे. अन्न सुरक्षा योजनेनुसार शहरात वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांच्या आत असलेले व ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांच्या आत असलेले बीपीएल कार्डधारक या योजनेसाठी पात्र आहेत. यात बीपीएल कार्डधारकांना महिन्याला प्रत्येकी २५ किलो गहू, तांदूळ प्रति किलो दोन ते तीन रुपये दराने तर योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल कार्डधारकांना महिन्याला प्रत्येकी १५ किलो गहू ७ रु. २० पैसे व तांदूळ ९ रु. ६० पैसे या दराने देण्याचा निर्णय झाला होता. यावेळी एपीएल कार्डधारकांच्या पुरवठ्यावर राज्याच्या मंत्रिमंडळानेही शिक्कामोर्तब केले असून तसे परिपत्रक जानेवारी २०१४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु एपीएल केशरी रेशनकार्ड धारकांना गेल्या चार महिन्यांपासून रेशनिंग दुकानात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावेळी शिधावाटप अधिकार्यांनी सांगितले की एपीएलधारकांना येत्या १ जूनपासून धान्य मिळणार आहे. (वार्ताहर)