Join us  

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 6:53 PM

Anvay Naik suicide case : अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे या याचिकेवरील सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.

मुंबई  - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम दिलासात शुक्रवारी वाढ करण्यात आली. तसेच त्यांना अलिबाग सत्र न्यायालयात उपस्थित राहण्यापासूनही वगळण्यात आले. 

अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबागचे वास्तुविशारद नाईक यांना त्यांचे थकीत पैसे आरोपींनी न दिल्याने त्यांनी मे २०१८ मध्ये  आत्महत्या केली.  गुन्हा रद्द करण्यासाठी व त्यानंतर दाखल करण्यात आलेले दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी या तिघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.

या तिघांनीही अलिबाग न्यायालयात उपस्थित राहण्यापासून वगळण्यात यावे, अशीही मागणी  याचिकीद्वारे केली आहे. ५ मार्च रोजी उच्च न्यायालयाने या तिघांना १६ एप्रिलपर्यंत अलिबाग न्यायालयात सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा दिली होती. मात्र, १६ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू राहणार नसल्याने गोस्वामी  व अन्य दोघांनी मुदतवाढ मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. 

अलिबाग न्यायालयात पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार असल्याने तोपर्यंत अंतरिम दिलासा द्यावा, अशी विनंती गोस्वामी यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने गोस्वामी यांच्या याचिकेवर २३ एप्रिल रोजी ठेवत तोपर्यंत अंतरिम दिलासा दिला. गोस्वामी व अनु दोघांना ४ नोव्हेंबर २०२० रोजी अलिबाग पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. परंतु, उच्च न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकारदिल्यावर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सर्वांची जामिनावर सुटका केली. 

टॅग्स :सत्र न्यायालयउच्च न्यायालयअर्णब गोस्वामीअन्वय नाईकअलिबाग