सवाल जवाब
By Admin | Updated: November 23, 2015 01:19 IST2015-11-23T01:19:52+5:302015-11-23T01:19:52+5:30
शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात मला नौटंकी करण्याची गरज वाटत नाही. मी घेतलेल्या आक्षेपांची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

सवाल जवाब
विनोद तावडेंचा मसुदा मुख्यमंत्र्यांनीच नापास केलाय
शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात मला नौटंकी करण्याची गरज वाटत नाही. मी घेतलेल्या आक्षेपांची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मसुद्याला लाल सिग्नल दाखविला. तावडेंचा मसुदा एक प्रकारे नापासच केला. मी कोणतीही निवडणूक लढवत नाही. त्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जी काही दिशाभूल केली आहे, ती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच केली आहे. हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यावर राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझी समज जास्त आहे. तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी माझ्या आक्षेपांची दखल घेतली. तावडे यांनी समजून घेतले नाही. तेव्हा त्यांची समज कमी आहे, हेच त्यातून उघड होत आहे, असा टोला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी लगावला.
शिक्षणाचा मसुदा जो करण्यात येणार आहे, त्यात दलित, आदिवासी, शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना प्रवाहातून संपवून टाकण्याचा प्रयत्न होता. ‘अॅबॉलिश’ असा शब्दप्रयोग करण्यात आला होता. ही सूचना घटनाविरोधी व मानवताविरोधी होती. त्यामुळे शिक्षक आमदार या नात्याने माझी आद्यजबाबदारी आहे की, शिक्षणाच्या क्षेत्रात जेजे काही अन्यायकारक होत आहे, त्याला विरोेध करणे, ते सरकारच्या निदर्शनास आणून देणे, ते माझे काम मी केले. शाळेचे तास सहावरून आठ करणे, ही सूचनाही अत्यंत वाईट आहे. शाळेचा कोंडवाडा करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. मुले आणखीन दोन तास जास्त कोंडली जाणार आहेत. त्यावर आजही मी ठाम आहे. इयत्ता पाचवीपर्यंत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेची तोंडओळख होणे, यातून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय करणारा आहे. पुन्हा यातून भाषेची गळचेपी होणार आहे. शासनाने तयार केलेल्या अहवालावर सूचना व हरकती मागविल्या होत्या. सूचना व हरकती घेणे, हे चुकीचे आहे, तर मी अशा चुका चांगल्या कामासाठी करण्यासाठी वारंवार सज्ज आहे.
शिक्षणाच्या मसुद्यावरून
केलेली टीका अनाठायी
राज्यात व केंद्रात गेली अनेक वर्षे काँग्रेस आघाडीचे सरकार होते. गेल्या ३० वर्षांत आघाडी सरकारने सामान्य जनतेला कधीही विचारात न घेता शिक्षणासंबंधी उलटसुलट निर्णय घेतले. त्याचा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. गेल्या ३० वर्षांनंतर आमच्या सरकारने प्रथमच जनतेला विश्वासात घेऊन शिक्षणाचे धोरण जाहीर केले आहे. त्यावर प्रतिक्रि या, सूचना आणि प्रस्ताव मागविले आहेत. आमदार कपिल पाटील यांनी मसुद्यावर नौटंकी केली आहे. जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यावर तीव्र प्रतिक्रि या आल्या आहेत. पाटील व इतर लोक विषय समजून घेण्यास कमी पडले, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.
लोकांमध्ये गैरसमज पसरविला गेला आहे. राजकीय शिक्षक संघटनांनी पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. हा अत्यंत वाईट प्रकार आहे. किमान शिक्षणाच्या क्षेत्रात तरी असे कृत्य करण्यात येऊ नये, अशी माझी माफक अपेक्षा आहे. समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. शिक्षक, पालक, संस्थाचालक, विद्यार्थी यांना विश्वासात घेऊन धोरण ठरवावे, असा माझा प्रामाणिक हेतू होता. हे धोरण केवळ महाराष्ट्रासाठी नसून संपूर्ण देशासाठी आहे. केंद्र सरकारने तो मसुदा तयार केला आहे. तो राज्यांकडे पाठविला आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या मसुद्यावर सूचना, प्रस्ताव आल्यावर हा मसुदा मंजूर केला जाणार आहे. त्याआधारे धोरण ठरणार आहे. अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्याआधीच एवढा गोंगाट काही मंडळी घालत आहे. मसुद्यामध्ये १५ गोष्टींचा समावेश आहे. राज्यभरातील २६ हजार गावांपैकी ३५ ठिकाणच्या शिक्षक, पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा, संवाद करण्याचे कार्यक्र म करण्यात आले आहेत. त्यानंतर, सरकार शिक्षणाचे धोरण ठरविणार आहे. ३० वर्षांनंतर अशा एका चांगल्या प्रक्रि येला सुरुवात होत आहे. तिचे स्वागत करण्याऐवजी तिला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.