Join us  

'असली दळभद्री वक्तव्ये सरकारची राज्याप्रती जाणीव दाखवतात, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्याव'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 9:44 PM

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन मलिक यांना पुरावे देण्याचं आव्हानं दिलंय. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत

ठळक मुद्देभाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन मलिक यांना पुरावे देण्याचं आव्हानं दिलंय. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत

मुंबई – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशातच मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुपल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिकांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी असं खुलं चॅलेंज भाजपाने दिलं आहे. तर, दुसरीकडे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दात मलिक यांच्या आरोपावरुन सरकारला लक्ष्य केलंय. (Politics Between BJP And Nawab Malik over Remdesivir Injection)  

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन मलिक यांना पुरावे देण्याचं आव्हानं दिलंय. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी सरकारनं दोषारोप करणं थांबवावं आणि कठीण काळात स्वत:चं काम करावं, असा सल्लाही केशव उपाध्ये यांनी दिला आहे. त्यानंतर, आता इतर भाजपा नेतेही नवाब मलिक यांच्या वक्तव्यावरुन संतापले आहेत. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. ''अकार्यक्षम महाराष्ट्र सरकारचे बेजवाबदार मंत्री नवाब मलिक यांच्या दांभिक आरोपाचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे. अन्यथा जनतेची दिशाभूल करणाऱ्या मलिकांना पायउतार करावे. महाराष्ट्रात मृत्युचे तांडव सुरू असतांनाही असले दळभद्री वक्तव्ये सरकारची राज्याप्रती जाणीव दर्शवतात, अशा शब्दात बावनकुळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.     

नवाब मलिकांनी काय आरोप केला?

केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार दिला आहे. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणार्‍या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकार पुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. 

टॅग्स :नवाब मलिककोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसचंद्रशेखर बावनकुळे