न दिसणाऱ्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:59+5:302021-02-05T04:28:59+5:30

मुख्यमंत्री : ५ विभागीय सायबर पोलीस ठाण्यांचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सायबर क्राईम डाेळ्यांना दिसत नाही. अशा ...

Amu's war with the invisible enemy continues | न दिसणाऱ्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू

न दिसणाऱ्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू

मुख्यमंत्री : ५ विभागीय सायबर पोलीस ठाण्यांचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सायबर क्राईम डाेळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रूसंगे आपले युद्ध आता अधिक सक्षमतेने सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताकदिनी ५ विभागीय सायबर पोलीस ठाण्यांच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. त्यासाठी सायबर पोलीस ठाणे नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दक्षिण विभागाच्या सायबर पोलीस ठाण्याचे प्रत्यक्षात, तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे तसेच ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे ऑनलाइन उद्घाटन केले. कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी झाले होते. तर मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, उपगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हाही एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रूपाने उपलब्ध आहे, याचा अभिमान आहे. सायबर सेलसोबतची मूळ पोलीस ठाण्याची इमारत १०३ वर्षांची असली तरी मजबूत आहे. तिच्यात आधुनिकतेकडे पाऊल टाकणारे सायबर पोलीस ठाणे सुरू केल्याने आधुनिकता आणि परंपरेचा मिलाप झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. या गुन्हेगारी विश्वावर धाक निर्माण करणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. महिला सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध आहे. पोलिसांच्या स्वागत कक्षामुळे पोलीस आणि नागरिकांमधील नाळ अधिक घट्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

* वर्षभरात मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या १० हजार तक्रारी - पोलीस आयुक्त

मुंबईत गेल्या वर्षभरात सायबर गुन्ह्यांसंबंधित १० हजार तक्रारी आल्या. तर अडीच हजार गुन्हे नोंद केल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी यावेळी सांगितले. नवीन सायबर पोलीस ठाणे अशा तक्रारी मार्गी लावण्यास उपयुक्त ठरेल. येथे २ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत फसवणुकीचे गुन्हे नोंद करता येतील. आतापर्यंत सायबर गुन्ह्यांसाठी तक्रारदाराला बीकेसीतील सायबर पोलीस ठाणे गाठावे लागत होते. मात्र आता प्रादेशिक स्तरावर स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू झाल्याने ते नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल. येथे ५० टक्के मनुष्यबळ महिलांचे असेल. ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षात नागरिकांना तक्रारी मांडणे अधिक सोयीस्कर होईल. यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून तक्रारी नोंदवण्यासाठी सर्वताेपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.

* ९०० कोटींचा सायबर गुन्हेगारी सुरक्षा प्रकल्प लवकरच होणार सुरू - गृहमंत्री

सायबर गुन्हे राेखण्यासाठीचा ९०० कोटींचा सायबर गुन्हेगारी सुरक्षा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. अँटी नार्कोटिक सेल अधिक सक्षम करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तर, सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. स्वागत कक्षाच्या माध्यमातून माया, आपलेपणाची ऊब जाणवेल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

* येथे असतील नवीन सायबर पोलीस ठाणे

पूर्व विभाग - शिवाजीनगर पोलीस ठाणे (गोवंडी), पश्चिम विभाग - पश्चिम प्रादेशिक विभाग कार्यालय (वांद्रे), उत्तर विभाग - समता नगर पोलीस ठाणे, मध्य विभाग - वरळी पोलीस ठाणे, दक्षिण विभाग - दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाणे.

....................................

Web Title: Amu's war with the invisible enemy continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.