राजकीय महत्त्वाकांक्षेचा गोंगाट
By Admin | Updated: March 10, 2015 00:43 IST2015-03-10T00:43:12+5:302015-03-10T00:43:12+5:30
निवडणुका जवळ आल्यामुळे नगरसेवक होवू इच्छिणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे.

राजकीय महत्त्वाकांक्षेचा गोंगाट
नामदेव मोरे, नवी मुंबई
निवडणुका जवळ आल्यामुळे नगरसेवक होवू इच्छिणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे. रविवारी शिवजयंती व महिला दिनानिमित्त प्रत्येक प्रभागात २ ते ३ कार्यक्रम आयोजित केले होते. दिवसभर सुरू असलेल्या ढोल - ताशांचा गजर व लाऊडस्पीकरमुळे दहावीचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले.
निवडणुका जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एक महिन्यापासून सामाजिक उपक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. आरोग्य शिबिर, मोफत विमा, देवदर्शनाच्या सहली, महापुरुषांच्या जयंती उत्साहाने साजऱ्या केल्या जात आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षेतून समाजसेवेचे पीक आले असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास होवू लागला आहे. रोज कार्यक्रमानिमीत्त लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा फटका बसत आहे. रविवारी शिवजयंती व महिला दिनानिमित्त विक्रमी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विभागात २ ते ३ कार्यक्रम होते. शहरात एकाच दिवशी ३०० पेक्षा जास्त कार्यक्रमांचा विक्रम झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमानिमित्त लाऊडस्पीकर लावले होते. शिवजयंतीनिमित्त ढोल - ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.
आपला कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी सर्वच धडपडत होते. परंतु या स्पर्धेमुळे नागरिकांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. दहावीची परीक्षा सुरू आहे. गोंगाटामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला नाही. ज्येष्ठ नागरिक व रुग्णांनाही गोंगाटामुळे गैरसोयींना सामोरे जावे लागले. दिवसभर सुरू असलेल्या ध्वनिप्रदूषणाविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका व परीक्षांचा कार्यकाळ एकच आहे. यामुळे एप्रिलपर्यंत राजकारण्यांचा गोंगाट सुरूच राहणार असून त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
नवी मुंबईमध्ये मागील काही वर्षांपासून ध्वनिप्रदूषण सातत्याने वाढत आहे. पालिकेच्या पर्यावरण अहवालामधून हे वास्तव समोर आले आहे. प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रदूषणामध्ये आता राजकीय गोंगाटाचा समावेश झाला आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी कार्यक्रम घेताना व लाऊडस्पीकरचा वापर करताना परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.