अंबरनाथचे नगरसेवक अधिकाऱ्यांवर बरसले
By Admin | Updated: June 16, 2015 23:24 IST2015-06-16T23:24:43+5:302015-06-16T23:24:43+5:30
शहरातील पाणीसमस्येचा आढावा घेऊन तिच्या निराकरणासाठी बोलविलेल्या बैठकीत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

अंबरनाथचे नगरसेवक अधिकाऱ्यांवर बरसले
अंबरनाथ : शहरातील पाणीसमस्येचा आढावा घेऊन तिच्या निराकरणासाठी बोलविलेल्या बैठकीत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पाणीसमस्या पोटतिडकीने मांडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने निष्क्रिय अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी सर्वांनी उचलून धरली.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता वीज वितरण विभागाशी संबंधित समस्येसाठी बैठक बोलविली होती. ही बैठक संपल्यावर लागलीच पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यात सर्वच नगरसेवक आक्रमक झाले. नव्याने नियुक्त झालेले कार्यकारी अभियंता बी.एस. राठोड यांना शहरातील पाणीसमस्येची कल्पना देण्यासाठी सर्व नगरसेवक पोटतिडकीने बोलत होते. पाणीपुरवठा सभापती सुभाष साळुंखे आणि बांधकाम सभापती सदाशिव पाटील यांनी पाणीप्रश्नावर सर्वप्रथम आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर, कोहजगावचे नगरसेवक उमेश पाटील, नगरसेविका वृषाली पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गेल्या तीन वर्षांत कोहजगाव आणि कमलाकरनगर या प्रभागांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नगरसेवकांनी स्वत: १५ लाखांहून अधिकचा खर्च केला आहे. जीवन प्राधिकरण वेळेवर आणि पुरेसे पाणी देत नसल्याने नगरसेवकांना नाहक स्वखर्चाने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची तक्रार उमेश पाटील यांनी केली. तसेच ज्या टाकीतून पुरवठा होतो, ती योग्य प्रकारे भरलीच जात नसल्याचा आरोप त्यांनी सभेत केला. तसेच चिखलोली धरणाच्या उंचीवाढीचा प्रस्ताव अद्यापही कागदावरच असल्याचा आरोप सभापती साळुंखे यांनी केला. अंबरनाथ शहराला तुटवडा भासत असलेल्या भागासाठी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी रचना रसाळ यांनी केली.
नगरसेवकांचा संताप पाहून स्वत: अधिकारी राठोड यांनी ही समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच आमदार किणीकर यांनी या पाणीपुरवठ्यासंदर्भात योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिल्यावर ही सभा संपविण्यात आली.
(प्रतिनिधी)