अंबरनाथ-बदलापूरात आघाडी आणि युती तुटली
By Admin | Updated: April 1, 2015 00:04 IST2015-04-01T00:04:35+5:302015-04-01T00:04:35+5:30
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांसाठी आघाडी आणि युती झालेली नाही.

अंबरनाथ-बदलापूरात आघाडी आणि युती तुटली
अंबरनाथ : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांसाठी आघाडी आणि युती झालेली नाही. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी स्वबळावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अंबरनाथमध्ये रिपाई सेक्युलरने राष्ट्रवादीसोबत तर रिपाई आठवले गटाने भाजपासोबत आघाडी केली आहे. रिपाईचे गट वगळता सर्व प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे.
अंबरनाथ आणि बदलापुर या दोन्ही नगपरिषदांच्या निवडणूकीसाठी आघाडी आणि युतीसंदर्भात बोलणी सुरु होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी आणि युती न झाल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालिकेत प्रचंड गर्दी झाली होती. काँग्रेस पक्षाने स्वबळावर ४० उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. तर राष्ट्रवादी आणि रिपाई सेक्युलरने अनुक्रमे ३६ व २१ जागा वाटप करुन घेतले असले तरी सहा ठिकाणी जागा देता आली नाही. भाजपाकडून ५७ उमेदवार रिंगणात असुन त्यातील ७ जागा ह्या रिपाई सेक्युलरला देण्यात आल्या आहेत. तर शिवसेनेच्या वतीने सर्व ५७ जागांवर आपले उमेदवार दाखल केले आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पालिकेत चोख पोलीस बंदोबस्त होता. दिवसभरात अंबरनासाठी ५५० तर बदलापूरसाठी २२३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.