Join us  

रामदास आठवलेंचं वेगळंच गणित; म्हणे, भारिप-एमआयएम युती मजबूत होऊ दे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 3:18 PM

औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांच्या पाठिंब्याने निवडणुका लढण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुंबईः प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र आल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी या नव्या मित्रांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारिप-एमआयएम युती जितकी मजबूत होईल, तितकीच भाजपा-रिपाइं युती भक्कम होणार आहे. कारण, त्यांच्या एकत्र येण्याचा फायदा भाजपालाच होणार आहे, असं समीकरण आठवले यांनी मांडलं. दलितांची सर्वाधिक मतं आपल्या पक्षासोबत आहेत, प्रकाश आंबेडकरांची ताकद फक्त अकोल्यापुरतीच आहे, असंही त्यांनी नमूद केलं.   

औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांच्या पाठिंब्याने निवडणुका लढण्याची घोषणाही त्यांनी केली. स्वाभाविकच, या नव्या ऐक्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या बेरजा-वजाबाक्या मांडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवरच, रामदास आठवले यांनी आपलं गणित मांडलं. 

दलित आणि मुस्लिमांची काँग्रेसला मिळणारी मतं भारिप-एमआयएम युतीकडे वळल्यास या मतविभाजनाचा फायदा भाजपालाच होईल. रिपाइंची संघटना महाराष्ट्रभर असल्याने आम्हाला मिळणाऱ्या दलित मतांवर काहीच फरक पडणार नाही. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची ताकद आहे, पण बाहेर रिपाइंला समर्थन अधिक आहे. कालची सभा मोठी झाली असली, तरी त्याचं रूपांतर मतांमध्ये होईलच असं नाही, याकडे आठवले यांनी लक्ष वेधलं. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेलवरून करत असलेल्या टीकेचा फारसा परिणाम होत नाहीए. त्यामुळे भारिप-एमआयएम युती मजबूत होऊ दे, म्हणजे आमची युतीही मजबूत होईल, अशी कोपरखळी त्यांनी मारली. 

टॅग्स :रामदास आठवलेप्रकाश आंबेडकरअसदुद्दीन ओवेसी