- मनोज गडनीसमुंबई - एकीकडे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय विमान उद्योगात नवनव्या विक्रमांची नोंद होत असतानाच गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला अपघात घडल्यानंतर या उद्योगावर आता संकटाचे ढग साठण्यास सुरुवात झाली आहे. या अपघातामुळे काही काळ तरी लोकांचा विमान प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि प्रवासी संख्या घटल्याने त्याचा फटका या उद्योगाला बसेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जगातील तिसऱ्या क्रमांकाची विमानसेवा, असा लौकिक असलेल्या भारतीय विमान उद्योगाचे सध्या मूल्यांकन १६ अब्ज अमेरिकी डॉलर इतके आहे. यामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील विमानतळांच्या संख्येत वाढ होत, हा आकडा आता ४८७ इतका झाला आहे, तर आजघडीला देशात एकूण ८०० विमाने आहेत. विमानतळांची संख्या वाढल्यामुळे पर्यायाने अनेक ठिकाणची जोडणी वाढल्यामुळे गेल्या दोन वर्षांत दहा कोटी लोकांंनी विमान प्रवास केला आहे. अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांकडून वेळोवेळी आकर्षक योजना सादर केल्या जात आहेत. परिणामी, प्रत्येक महिन्यागणिक विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, गुरुवारच्या अपघातानंतर अनेकांच्या मनात विमान प्रवासाबद्दल भीती निर्माण होऊ शकते. परिणामी, याचा फटका विमान उद्योगाला बसू शकतो. मात्र भारतीय हवाई वाहतूक उद्योग हा जगातल्या सर्वोत्कृष्ट व्यावसायिक उद्योगापैकी एक आहे त्यामुळे या अपघातामुळे लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असे मत विमान व्यावसायिक मंदार भारदे यांनी व्यक्त केले.
विमा उद्योगाला ११ अब्ज रुपयांचा दणका गुरुवारच्या विमान अपघातानंतर संबंधित विमानाला विमा देणाऱ्या कंपनीला ११ अब्ज रुपयांपर्यंतचा परतावा द्यावा लागेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. यापैकी ८ अब्ज रुपये, हे प्रत्यक्ष विमानाची भरपाई म्हणून, तर उर्वरित ३ अब्ज रुपये अन्य विविध कारणांसाठी द्यावे लागणार आहेत. या विम्याच्या रकमेमध्ये विमानाचे नुकसान, प्रवाशांना भरपाई, थर्ड पार्टी नुकसान आदी काही गोष्टींचा समावेश असतो. याखेरीज प्रवाशांनी जर वैयक्तिक विमान प्रवास विमा काढला असेल किंवा त्यांचा काही वैयक्तिक विमा असेल, तर त्याचेदेखील पैसे आता संबंधित कंपन्यांना द्यावे लागणार आहेत.
लोकांना कशाकशाची भीती वाटते?विमान प्रवासादरम्यान टर्ब्युलन्स (खराब हवामान) परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी हवेत असलेले विमान जोराने धडधडते, याचीदेखील अनेक लोकांना भीती असते. विमानाने उड्डाण केल्यानंतर उतरतेवेळी त्याची चाकेच बाहेर आली नाहीत, तर काय होईल- हार्ड लँडिंग किंवा विमान उतरतेवेळी जर विमानाची चाके आदळली तरीदेखील लोकांना भीती वाटते. विमान उड्डाण करताना विमानाची शेपटी जमिनीवर घासली तर?