एआयएमआयएमचा मुस्लिमांना नवा पर्याय
By Admin | Updated: October 20, 2014 03:07 IST2014-10-20T03:07:03+5:302014-10-20T03:07:03+5:30
राज्यात प्रथमच लढणा-या ओवेसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने गिरणगावातील शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरलेली ही जागा जवळपास बळकावली म्हटले तर वावगे ठरणार नाही.

एआयएमआयएमचा मुस्लिमांना नवा पर्याय
मुंबई : मुंबईच्या ३६ मतदारसंघांत सर्वांत धक्कादायक निकाल होता तो भायखळा विधानसभा मतदारसंघातील. राज्यात प्रथमच लढणा-या ओवेसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने गिरणगावातील शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरलेली ही जागा जवळपास बळकावली म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ओवेसी बंधूंच्या वादळाने उभ्या मुंबापुरीला तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. ओवेसी बंधूंच्या या वादळाने २००९ सालच्या विधानसभेत की फॅक्टर ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वादळाची आठवण करून दिली. तर एआयएमआयएमने मुस्लीम समाजाला नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एआयएमआयएमने मुंबईत ५ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यात भायखळा मतदारसंघात वारिस पठाण यांच्या रूपात पक्षाला पहिला आमदार मिळाला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे उर्वरित ४ जागांवरील पक्षाच्या उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. परिणामी, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी यांनीही आता एआयएमआयएमचा धसका घेतला आहे. कारण विधानसभा निवडणुकीत जोरदार आगमन केलेल्या एआयएमआयएमचा मोठा फटका मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता बळावली आहे. (प्रतिनिधी)