मध्य रेल्वेवर ‘अग्नितांडव’
By Admin | Updated: May 8, 2014 02:32 IST2014-05-08T02:32:25+5:302014-05-08T02:32:25+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय प्रवाशांचा प्रवास धोकादायक झाला असून अक्षरश: अग्नितांडवाचा खेळच सुरू आहे.

मध्य रेल्वेवर ‘अग्नितांडव’
सुशांत मोरे -
मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय प्रवाशांचा प्रवास धोकादायक झाला असून अक्षरश: अग्नितांडवाचा खेळच सुरू आहे. उपनगरीय लोकल गाड्यांना आग लागल्याच्या दोन वर्षांत नऊ घटना घडल्या असून त्यानंतरही रेल्वेकडून कुठल्याच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच सीएसटी स्थानकात उभ्या असलेल्या सह्याद्री, डेक्कन आणि हावडा ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागल्याची घटना लागोपाठ घडली आणि मध्य रेल्वेकडून केल्या जाणार्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर सीएसटी स्थानकात उभ्या असलेल्या लांब पल्ल्याच्या आणखी एका ट्रेनच्या डब्यात छोटी आग लागली आणि प्रवाशांच्या सुरक्षेचे गांभीर्य मध्य रेल्वेला नसल्याचे समोर आले. मेल-एक्स्प्रेस गाड्यांना आग लागल्याच्या घटना मध्य रेल्वेवर घडत असतानाच तत्पूर्वी लोकल गाड्यांनाही शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत अशा तब्बल नऊ घटना उपनगरीय मार्गावर धावणार्या लोकल गाड्यांबाबत घडल्या असून त्याबाबत रेल्वेकडून कुठल्याच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले. यात एक सिमेन्स कंपनीची लोकल, काही रेट्रोफिटेड आणि भेल कंपनीच्या लोकलचा समावेश असल्याचे ते म्हणाले. मुळात भेल कंपनीच्या लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न मोठा असून त्यावर कुणाचे नियंत्रण नसल्याने त्या लोकल गाड्यांना अपघात होत असल्याची माहिती त्यांनी सांगितली. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वेकडून कुठल्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत किंवा भविष्यात करण्यात येतील, याबाबत विचारण्यात आल्यानंतरही एकही उत्तर मध्य रेल्वेकडून आले नसल्याचे ते म्हणाले. नऊ घटनांची कारणे आणि पुन्हा एकदा उपाययोजना कुठल्या करणार, असे विचारले असता त्याचे उत्तर आजपर्यंत देण्यात आले नाही.
2014 या वर्षात सुरुवातीच्या तीन महिन्यांतच रेल्वेचे बारा वाजले. तब्बल बारा वेळा मध्य रेल्वे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली तर पश्चिम रेल्वे चार वेळा विस्कळीत झाली आहे.