Join us  

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही जात पडताळणी समितीची मनमानी

By अतुल कुलकर्णी | Published: August 23, 2018 2:27 AM

शिपायाच्या हुशार मुलीला मिळालेला प्रवेश नाकारला

मुंबई : सख्ख्या बहिणीकडे जात वैधता प्रमाणपत्र असतानाही तिच्या लहान बहिणीला जात पडताळणी समितीने पत्र देण्यास विलंब केला. त्यामुळे एका मुलीचा शासकीय विधी महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्यात आला आहे. रक्ताच्या नात्यात जात प्रमाणपत्र असल्यास तेच दुसऱ्यासही गृहीत धरावे, असा शासन आदेश असताना प्रवेश नाकारण्याची संतप्त घटना मुंबईत घडली आहे.राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत (सीईटी) चाललेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले आहेत. याआधी महाराष्ट्र सीईटी सेलने अजबरितीने प्रवेशाकरिता एक व कॉलेजच्या पर्यायासाठी दुसरा अर्ज अशी व्यवस्था केली. सीईटी सेल व एमकेसीएलच्या या सदोष पध्दतीमुळे हजारो विद्यार्थी प्रवेशाला मुकलेले असताना हे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. वारंवार विनंती अर्ज करुनही त्याची दखल घेण्यास सरकार तयार नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.लालासाहेब डोंबाळे हे पनवेलला भाड्याने राहतात. माहिमच्या गुरुनानक हायस्कूलमध्ये ते शिपाई आहेत. तुटपुंज्या पगारात त्यांनी एका मुलीला गुणवत्तेच्या जोरावर इंजियिनरिंगला प्रवेश मिळवून दिला, तर दुसºया मुलीला विधी महाविद्यालयात. मात्र सीईटी आणि एमकेसीएलच्या विचित्रपणामुळे त्यांची मुलगी संध्या डोंबाळे हिचा विधी शाखेत मिळालेला प्रवेश जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही म्हणून नाकारला गेला आहे.वास्तविक तिच्या मोठ्या बहिणीला इंजिनियरिंगला प्रवेश देताना २६ आॅक्टोबर २०१६ रोजीचे जात प्रमाणपत्र जोडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात पडताळणी समितीच्या खाबुगिरीला चाप बसण्यासाठी नवा जीआर काढला. तरीही एमकेसीएल आणि सीईटीने विधी विभागाचे प्रवेश देताना जात पडताळणीचे प्रमाणपत्र किंवा त्यासाठी केलेल्या अर्जाची पावती सोबत जोडावी, असा फतवा सीईटी सेलने काढला.संध्याने अर्ज भरला आणि राजगडच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केला, चकरा मारल्या मात्र प्रमाणपत्र मिळाले नाही. तुमची फाईल सापडत नाही असे उत्तर आधी दिले गेले. नंतर फाईल सापडली पण सही करणाºया अधिकारी बाई जागेवर नाहीत, असे सांगण्यात आले. दरम्यान, रायगडच्या जात पडताळणी समितीच्या सदस्यांनी शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून संध्याचे प्रकरण प्रलंबित आहे, असेही कळवले. तरीही ठरवून दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्र मिळाले नाही असे सांगत विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तिला प्रवेश नाकारला.विधी महाविद्यालयातील प्रवेशाबाबत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्री आणि महाराष्टÑ सीईटी आयुक्तांना पत्र लिहून चाललेल्या गलथानपणाची जंत्रीच लिहून दिली आहे. पण त्यावरही काहीच हालचाल झालेली नाही....तर न्याय कुणाकडे मागावा?अधिकाºयांनी वेळेवर प्रमाणपत्र दिले नाही त्यात माझ्या मुलीची काय चूक आहे, असा सवाल करणाºया डोंबाळेंना कोणतीही यंत्रणा उत्तर देण्यास तयार नाही. आता तिसºया प्रवेश फेरीकरता राज्य सामाईक प्रवेश कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पुन्हा अर्ज करा, असा सल्लाही त्यांना विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश काढूनही त्याची ही अवस्था असेल तर मुलांनी कोणाकडे न्याय मागावा, असा सवालही डोंबाळे यांनी केला आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसविद्यार्थीशिक्षण