मुंबई : झारखंड असो वा देशात अन्यत्र कोठेही झुंडशाहीच्या (मॉब लिचिंग) घटना घडल्यास समाजकंटकांवर योग्य ती कारवाई केली जाईल, त्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशारा केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी दिला.हज हाउस आॅफ इंडियाच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘भारत हे धर्मनिरपेक्ष राष्टÑ आहे. येथील बहुसंख्याक हिंदू समाज सहिष्णू आहे. त्यामुळेच अल्पसंख्याक समाज धार्मिक-सामाजिक विकासा च्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशावेळी काही जण हिंसाचार घडवित असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. तरबेज अन्सारीच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना योग्य ते शासन केले जाईल.मुस्लीम समाजाने नकारात्मक विचारधारा सोडून विकास, सौहार्द टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयएसआय, अतिरेक्यांचे देशातील नेटवर्क मोडून काढण्यासाठी ठाम उभे राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
झुंडशाही करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल- मुख्तार अब्बास नक्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 06:17 IST