गिरगावातील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई
By Admin | Updated: May 30, 2014 00:59 IST2014-05-30T00:59:53+5:302014-05-30T00:59:53+5:30
दक्षिण मुंबईतील गिरगाव-चंदनवाडी-बीआयटी चाळीतील सहा अतिधोकादायक इमारतींवर मुंबई महानगरपालिकेने कडक कारवाई केली आहे.

गिरगावातील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई
मुंबई : दक्षिण मुंबईतील गिरगाव-चंदनवाडी-बीआयटी चाळीतील सहा अतिधोकादायक इमारतींवर मुंबई महानगरपालिकेने कडक कारवाई केली आहे. नोटिसा बजावल्यानंतरही घरे खाली करण्यास नकार देणार्या येथील सुमारे ६८० कुटुंबांचा वीज आणि पाणीपुरवठा पालिकेने बुधवारी खंडित केला. याआधी ५० वर्षांहून जुन्या असलेल्या चंदनवाडी-बीआयटी चाळीचे पालिकेने स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यात इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घरे खाली करण्याच्या नोटिसाही पालिकेने बजावल्या होत्या. शिवाय वाशीनाका, मानखुर्द, चेंबूर येथील संक्रमण शिबिरांत रहिवाशांची पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, रहिवाशांनी दक्षिण मुंबईबाहेर पुनर्वसन करण्यास नापसंती दर्शवली होती. याउलट, संक्रमण शिबिरांतील घरांची अवस्थाच दयनीय असल्याचे चंदनवाडी-बीआयटी चाळ भाडेकरू संघाने सांगितले. येथील भाडेकरूने दिलेल्या माहितीनुसार, ‘धोकादायक घोषित केलेल्या चाळीतील केवळ शौचालय आणि शेडची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे डागडुजी केल्यास घरे खाली करण्याची गरज भासणार नाही. तरीही, घरे खाली करण्याची सक्ती करणार्या पालिकेने भाडेकरूंचे पुनर्वसन दक्षिण मुंबईतच करायला हवे. येथील भाडेकरूंची कार्यालये आणि मुलांच्या शाळा दक्षिण मुंबईत आहेत. परिणामी, राहत्या घरांपासून दूरवर पुनर्वसन केल्यास मुलांच्या शाळा आणि भाडेकरूंच्या कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.’