लोकलवर फुगे मारणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: March 5, 2015 00:50 IST2015-03-05T00:50:24+5:302015-03-05T00:50:24+5:30
होळीच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवाशांवर फुगे किंवा पिशव्या मारणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) घेतला आहे.

लोकलवर फुगे मारणाऱ्यांवर कारवाई
मुंबई : होळीच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवाशांवर फुगे किंवा पिशव्या मारणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) घेतला आहे. यासाठी स्थानकांवर जादा रेल्वे पोलीस तैनात करण्यात येणार असून झोपडपट्ट्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाशी बोलणी करून मोटरमनचीही मदत घेण्याचा निर्णय जीआरपीने घेतला आहे.
होळी, रंगपंचमीच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरात धावणाऱ्या लोकलवर फुगे किंवा पिशव्या मारण्यात येतात. प्रवाशांना याचा मोठा फटका बसतो. यामध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी होतात. गेल्या काही वर्षांत अशा घटना अनेकदा घडल्या असून त्या घडू नयेत यासाठी रेल्वे पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते. या वेळीही लोकलवर फुगे किंवा पिशव्या मारण्याच्या घटना घडू नयेत आणि प्रवाशांना त्याचा फटका बसू नये यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
जीआरपीने (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) रेल्वे स्थानकांलगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसांपासून ही जनजागृती केली जात असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
होळी आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी रेल्वे पोलिसांचा मोठा फौजफाटा स्थानकांवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ५ मार्च ते ८ मार्चपर्यंत रेल्वे पोलिसांच्या सुट्याही रद्द
करण्यात आल्या असल्याचे जीआरपी आयुक्त रवींद्र सिंघल यांनी
सांगितले. तसेच काही जुन्या आरोपींवर करडी नजर ठेवण्यात येत असून यातील अनेक आरोपींना ताब्यातही घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
१झोपडपट्ट्यांमधून फुगे किंवा पिशव्या मारण्यात येतात. या घटनेत आरोपी सापडणे कठीण असते. त्यामुळे एखादी घटना घडल्यास आरोपी सापडण्यास मदत व्हावी यासाठी मोटरमनलाही खास लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
२होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या मागील अनेक घटनांचा आढावा रेल्वे पोलिसांनी घेतला असून त्यादृष्टीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
३रेल्वे पोलिसांनी सात संवेदनशील ठिकाणेही निवडली असून त्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
४जीआरपीने आरपीएफचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या मदतीने झोपडपट्ट्यांमध्ये बैठका घेऊन जनजागृतीही केली जात आहे.