सर्वसामान्यांना दोन तासच प्रवेश
By Admin | Updated: May 21, 2014 05:09 IST2014-05-21T05:09:36+5:302014-05-21T05:09:36+5:30
महापालिकेच्या नवीन मुख्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दोन तासच प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. जनतेच्या पैशातून उभारलेल्या भव्य वास्तूपासून सामान्यांना दूर ठेवले जात आहे

सर्वसामान्यांना दोन तासच प्रवेश
नवी मुंबई : महापालिकेच्या नवीन मुख्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दोन तासच प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. जनतेच्या पैशातून उभारलेल्या भव्य वास्तूपासून सामान्यांना दूर ठेवले जात आहे. प्रवेशद्वारातून माघारी जावे लागत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. पालिकेच्या नवीन मुख्यालयामुळे शहराच्या लौकिकामध्ये भर पडली आहे. पामबीच रोडवरून जाताना ही वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चोवीस तास फडकणारा तिरंगा व राष्ट्रपती भवन व संसदेची एकत्रित प्रतिकृती असलेली इमारत पाहण्याचा मोह शहरवासीयांना रोखता येत नाही. नवी मुंबईतील अनेक नागरिक काही आवर्जून मुख्यालय पाहण्यासाठी येत आहेत. सर्वसामान्य नागरिक रेल्वेने सीबीडीपर्यंत येतात व तेथून अर्धा तास चालत यावे लागत आहे. अनेक नागरिक बसने शहराला वळसा घालून येथे येत आहेत. पामबीच रोडवरून जाणारे नागरिकही वाहने थांबवून मुख्यालय पाहण्यासाठी येत आहेत. परंतु उत्सुकतेने येथे आलेल्या नागरिकांची निराशा होत आहे. येथे सामान्य नागरिकांना दुपारी ३ ते ५ या वेळेतच प्रवेश दिला जात आहे. उर्वरित वेळेत येणार्या नागरिकांना सुरक्षा रक्षक बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. जुन्या मुख्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत नागरिकांना प्रवेश होता. कधीही येवून कामे करता येत होती. परंतु नवीन मुख्यालयात वेळेच्या मर्यादेमुळे सामान्यांना मुख्यालयाचे दुरून दर्शन घ्यावे लागत आहे. यामुळे यापेक्षा जुने कार्यालयच चांगले होते अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी प्रशासन उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)