Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या हत्येचा आरोप असलेल्या आईची जन्मठेप रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 03:57 IST

सत्र न्यायालयाने ठरवले होते दोषी

मुंबई : स्वत:च्या आठ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेप सुनाविण्यात आलेल्या आईची उच्च न्यायालयाने सुटका केली. ती निर्दोषत्व सिद्ध करू शकली नाही, याचा अर्थ ती दोषीही नाही, असे म्हणत न्यायालयाने ३२ वर्षीय मजूर महिलेची मुलाच्या हत्येतून सुटका केली.शालिनी गायकवाड हिच्या मुलाचा मृतदेह २८ मार्च, २०१८ रोजी विहिरीत सापडले. बुलडाणा जिल्ह्यातील पोलिसांनी मुलाची हत्या केल्याप्रकरणी शालिनीलाच अटक केली. मुलाचे शव सापडण्याच्या दोन दिवस आधी शालिनी तिच्या मुलाला शाळेत घेऊन जाताना लोकांना दिसली होती. त्या आधारावर पोलिसांनी तिला अटक केली. २९ मे, २०१९ रोजी सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे शालिनीला जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली.शालिनीने मुलाला बाहेर नेताना तिच्या मुलीने व शाळेतील शिक्षकांनी पाहिले होते. मात्र, त्यानंतर त्या मुलाचे काय झाले, हे ती सांगू शकली नाही. मुलाचे शव सापडण्याच्या दोन दिवस आधी तो त्याच्या आईबरोबर दिसला, याव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुरावे तिच्याविरुद्ध नाहीत, असे म्हणत उच्च न्यायालयाने शालिनीला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.असामान्य असे काही नाही!दोघांना (आई व मुलगा) एकत्र पाहून आणि त्यानंतर मुलाचे शव विहिरीत सापडणे, या दोन घटनांत २४ तासांचे अंतर आहे. आरोपी सकाळी मुलाला शाळेतून घेऊन गेली, याशिवाय अन्य कोणतेही पुरावे तिच्याविरोधात नाहीत. आईने मुलाला शाळेतून बाहेर नेणे, यात असामान्य असे काही नाही, असे म्हणत न्यायालयाने तिला दोषी मानण्यास नकार दिला.मे, २०१७ मध्ये शालिनीने पतीचे घर सोडले. पतीबरोबर वारंवार खटके उडत असल्याने तिने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. तिचे अन्य कोणावर तरी प्रेम आहे, या संशयावरून तिचा पती तिच्याशी वारंवार भांडत असे. या विवाहापासून शालिनीला एक मुलगी आहे व मुलाचा मृत्यू झाला.

टॅग्स :मुंबई हायकोर्ट