Join us  

आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 3:19 AM

आरे संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाने जितेंद्र आव्हाड यांची भेट याबाबत घेतल्याचे आरे संवर्धन समितीचे रोहित जोशी यांनी सांगितले.

मुंबई : आरे येथील मेट्रो-३च्या कारशेड विरोधात आंदोलन पुकारणाऱ्या आंदोलकांसह या विषयाशी निगडित ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे पुढच्या दहाच दिवसात प्रक्रिया पूर्ण करून मागे घेतले जातील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आरे संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले.आरे संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाने जितेंद्र आव्हाड यांची भेट याबाबत घेतल्याचे समितीचे रोहित जोशी यांनी सांगितले. भेटीवेळी आंदोलकांनी आपल्या अन्यायावरील पाढा वाचला. आपण स्वत: आंदोलक असल्यामुळे आमच्या भावना आपणास माहीत आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढावा, अशी विनंती केली.४ आॅक्टोबर २०१९ रोजी मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनने रात्री आरेमधील मेट्रो-३ साठी झाडे कापण्यास सुरुवात केली. यास येथील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. मात्र यावेळी २९ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलकांमध्ये अनेक जण विद्यार्थी, गृहिणी, आदिवासी समाजातील कार्यकर्ते आहेत. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडी सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ डिसेंबर २०१९ रोजी आरे आंदोलकांवरील गुन्हे माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. २ डिसेंबर २०१९ रोजी याबाबत शासन निर्णय जाहीर झाला. परंतु प्रत्यक्षात हा निर्णय कागदावरच राहिला. गेले १० महिने या निर्णयाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र अंमलबजावणी झाली नाही. या कारणाने आंदोलक विद्यार्थी, गृहिणी, आदिवासी यांना नाहक जाचाला सामोरे जावे लागत आहे. काहींना नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. तर काहींना पासपोर्ट काढण्यासाठी, तर काहींना घर मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. गुन्हे दाखल असल्याने पोलीस तपासणीशिवाय यापैकी कोणतेही काम होत नाही.

टॅग्स :आरेजितेंद्र आव्हाड