४२ वर्षाच्या नागरिकाचे अवयवदान, चौघांना मिळाले जीवदान
By संतोष आंधळे | Updated: March 18, 2024 22:45 IST2024-03-18T22:45:17+5:302024-03-18T22:45:43+5:30
Mumbai Health News: नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात रविवारी ४२ वर्षांच्या नागरिकाचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चौघांना जीवदान मिळाले आहे.

४२ वर्षाच्या नागरिकाचे अवयवदान, चौघांना मिळाले जीवदान
- संतोष आंधळे
मुंबई - नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात रविवारी ४२ वर्षांच्या नागरिकाचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चौघांना जीवदान मिळाले आहे. या अवयवदानातून हृदय, फुफ्फुस, यकृत , एक किडनी आणि हाडे दान केले आहे. हे या वर्षातील मुंबई विभागातील सातवे मेंदूमृत अवयदान आहे.
राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.