राज्यात तीन जिल्ह्यांत ८० टक्के लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:29+5:302021-02-05T04:25:29+5:30

धुळे, हिंगोली, अमरावतीचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाच्या तीव्र संक्रमणानंतर आता लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू ...

80% vaccination process completed in three districts of the state | राज्यात तीन जिल्ह्यांत ८० टक्के लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण

राज्यात तीन जिल्ह्यांत ८० टक्के लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण

धुळे, हिंगोली, अमरावतीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाच्या तीव्र संक्रमणानंतर आता लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील तीन जिल्ह्यांत ८० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले. यात राज्यातील धुळे, हिंगोली आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात लसीकरणाच्या सुरुवातीच्या ३-४ दिवसांत कमी प्रतिसाद दिसून आला त्यानंतर हे प्रमाण वाढले. शुक्रवारी ७३.३ टक्के आराेग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

राज्यात आतापर्यंत ६४.८ टक्के आराेग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून १ लाख १२ हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. याविषयी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळातही लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह होता; परंतु कोविनमधील तांत्रिक अडचणींचा या प्रक्रियेवर परिणाम झाला, तर राज्यातील काही जिल्ह्यांत लसीकरण केंद्र दूरवर असल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शविल्याचे दिसून आले.

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६८ कर्मचाऱ्यांना लस दिली आहे, या जिल्ह्याचे उद्दिष्ट १ हजार २०० इतके होते. अमरावती जिल्ह्यात दीड हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लक्ष्य होते, यात १ हजार २५४ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले, हे प्रमाण ८४ टक्के आहे. अमरावती जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या लाभार्थ्यांचेही सर्वाधिक प्रमाण आहे. राज्यात कोव्हॅक्सिन लसीचे दरदिवशीचे लक्ष्य ६०० आहे. मात्र, राज्यात केवळ अमरावतीमध्येच आतापर्यंत २५३ आराेग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली, तर हिंगोली जिल्ह्यात पहिल्या दिवशी १०० टक्के, दुसऱ्या दिवशी ६०, तर तिसऱ्या दिवशी १०७ टक्के लसीकरण करण्यात आले.

* सर्वांत कमी लसीकरण रायगडमध्ये

रायगड जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वांत कमी लसीकरणाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यात १२०० लाभार्थ्यांची यादी करण्यात आली होती. त्यातील केवळ ५५७ आऱोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या लसीकरणाचे प्रमाण सर्वांत कमी ४६ टक्के आहे. जनजागृती उपक्रम हाती घेतला नसल्याने प्रतिसाद कमी असल्याचे दिसून आले आहे. शिवाय, जिल्ह्यात चार लसीकरण केंद्र असून प्रवासाकरिताही कर्मचाऱ्यांना दूर जावे लागत आहे.

Web Title: 80% vaccination process completed in three districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.