लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात आजमितीस ४ कोटी ९५ लाख वाहनांची नोंद झाली असून, मुंबईत दररोज ७९४ नव्या वाहनांची नोंद होत आहे. यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरात मेट्रोचे जाळे विस्तारित करण्यात येणार आहे. राज्यातील वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाच उपाय आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील वाहतूक कोंडी, चुकीची चलने, पोलिसांची कारवाई आणि मोठ्या शहरांतील प्रकल्पांसंदर्भात आ. सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेत उत्तर देताना ते बोलत होते. मुंबईसह सर्व मेट्रो शहरांमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. वाहनांची वाढती संख्याही वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे, असे ते म्हणाले.
वाहतूक नियंत्रण करताना पोलिस, परिवहन आणि महसूल विभाग एकत्रित कारवाई करतात. यामुळेही ट्रॅफिक जाम होते. यावर तोडगा काढण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचेही त्यांनी सांगितले.