जिल्ह्यात ७५ टक्के भात पेरण्या पूर्ण
By Admin | Updated: June 15, 2015 22:27 IST2015-06-15T22:27:18+5:302015-06-15T22:27:18+5:30
यंदा आतापर्यंत जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने जिल्ह्यातील तो अनुकूल ठरला असून, जिल्ह्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

जिल्ह्यात ७५ टक्के भात पेरण्या पूर्ण
अलिबाग: यंदा आतापर्यंत जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने जिल्ह्यातील तो अनुकूल ठरला असून, जिल्ह्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. भाताच्या रोपांची उगवण देखील चांगली असल्याची माहिती रायगड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी के.बी.तरकसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एक लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिके घेण्यात येत आहेत. यामध्ये एक लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रात तांदळाची लागवड होत आहे. प्रत्येकी १० हजार हेक्टर क्षेत्रावर नागली व तूर ही पिके घेण्यात येत आहेत. भात व अन्य बियाणांच्या बाबत जिल्ह्यात कोठेही शेतकऱ्यांकडून तक्रार नाही. १ जूनपासून युरिया या खताची निर्मिती बंद करुन, अधिक प्रभावी निमकोटेड युरिया देण्यात येणार आहे. निमकोटेड युरियाच्या खरेदीकरिता १४ रुपये अधिक मोजावे लागत असल्याने काही ठिकाणी याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे तरकसे यांनी अखेरीस सांगितले.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान वाढले असल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना चांगली साथ देईल, असा विश्वास प्रयोगशील शेतकरी गजानन पाटील यांनी व्यक्त केला आहे. पेरण्या यंदा वेळेत पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले.(विशेष प्रतिनिधी)