२० कोटी खर्चून बांधणार ६९ नवे बंधारे
By Admin | Updated: June 1, 2015 22:44 IST2015-06-01T22:44:47+5:302015-06-01T22:44:47+5:30
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांत नव्याने ६९ बंधारे उभारण्यात येणार आहेत. या कामांसाठी दोन वेळा निविदा काढल्यानंतर रत्नागिरी

२० कोटी खर्चून बांधणार ६९ नवे बंधारे
पंकज रोडेकर, ठाणे
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांत नव्याने ६९ बंधारे उभारण्यात येणार आहेत. या कामांसाठी दोन वेळा निविदा काढल्यानंतर रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांतील २० बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, कामांबाबत घातलेल्या जाचक अटींमुळे रायगड जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने तेथे तिसऱ्यांदा निविदा काढण्यात येणार आहे. या योजनांसाठी २० कोटींचे बजेट असून त्यातील १७ कोटींच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत. तर ठाणे जिल्ह्यात अवघे नऊच बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजना राज्यात राबविण्यात येत आहे. त्याप्रमाणे कोकण विभागातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत योजनेंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ६९ बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, बंधारे उभारण्याच्या निविदांचे कार्यक्रम आखण्यात आले. त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर लघुपाटबंधारे विभागाने दोन वेळा निविदा काढल्या. त्यानुसार, पालघर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील २० बंधाऱ्यांच्या कामांची वर्कआॅर्डर काढून ही कामे सुरू केली आहेत. सर्वाधिक बंधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येणार असून त्यापाठोपाठ असलेल्या रायगड जिल्ह्यात कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.