नवी मुंबई - गणेशाेत्सवानिमित्त मुंबई बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सोमवारी १६८ टन सफरचंद व ४५७ टन मोसंबी अशी एकूण ६२५ टन आवक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साथीच्या आजार डाेके वर काढत आहेत. त्यामुळे पपईसह लिंबूवर्गीय फळांनाही ग्राहकांकडून मागणी वाढू लागली आहे.
पावसाळ्यामध्ये फळांचे उत्पादन कमी होत असले तरी आयात फळांसह देशाच्या विविध विभागांत उपलब्ध होणारी फळे मुंबई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असतात. डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांमुळे डॉक्टरही फळे खाण्याची विशेष: लिंबूवर्गीय फळे खाण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे पावसामध्येही फळांना चांगली मागणी निर्माण झाली आहे. बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक सफरचंदची होत आहे. गत आठवड्यात सरासरी ३०० ते ३५० टन आवक होत होती. सोमवारीही १६८ टन आवक झाली. हिमाचल प्रदेशमधून आवक सुरू आहे. होलसेलमध्ये ८० ते १२० तर किरकोळ मार्केटमध्ये १८० ते २६० रुपये किलो दराने सफरचंदची विक्री होत आहे.
‘ड्रॅगन’ला माेठ्या प्रमाणात मागणीसोमवारी सर्वांत जास्त ४५७ टन आवक मोसंबीची झाली. आंध्र प्रदेशमधून ती सुरू आहे. बाजार समितीमध्ये २५ ते ५० रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते १०० रुपये किलो दराने माेसंबीची विक्री होत आहे. किवी, ड्रॅगन फ्रुटसोबत पपईची मागणीही वाढली आहे. सरासरी ३० ते ५० टन पपईची विक्री होत आहे. गणेशोत्सवामुळे या आठवड्यात फळांची आवक मोठ्या प्रमाणात होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. सफरचंद, मोसंबी, संत्री, डाळिंब, पेरूसह इतर सर्वच फळांना गणेशभक्तांकडून मागणी वाढणार असल्याचेही व्यापारी सांगत आहेत.