मुंबई = पारंपरिक अभ्यासक्रमांना रोजगारभिमुख बनविण्यासाठी आता त्यांना कौशल्याची जोड दिली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवीमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबतची मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केली जाणार आहे, असे युजीसीचे माजी अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के शिक्षण हे संबंधित विषयाचे दिले जाईल, तर उरलेले ५० टक्के शिक्षण कौशल्याधारित विषयांचे असेल. उद्योग जगताकडूनही विशिष्ट अभ्यासक्रमांची मागणी केली जाते. विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेसाठी अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याचा निर्णय युजीसीने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून पदवीलाही ५० टक्के मिळविण्यासाठी कौशल्यवृद्धीचे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील.
विषयासोबतच उद्योग कौशल्याचे ज्ञानदेशभरात उच्च शिक्षण घेणाऱ्या साडेचार कोटी विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थी हे पारंपरिक बीए, बीकॉम, बीएससी या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात हे अभ्यासक्रम नोकरी मिळवून देण्यासाठी पुरेसे नाही. यामुळे यूजीसीने आता ‘इंटिग्रेटेड स्कील्ड कोर्सेस’ तयार करण्याचा घेतला आहे, असे एम. जगदीश कुमार यांनी सांगितले.एखाद्या विद्यार्थ्याने बीएचा पर्याय निवडून इतिहासात शिक्षण घेण्याचे ठरवले, तर त्याच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षांत त्याला १६० श्रेयांकांपैकी ५० टक्के म्हणजे ८० श्रेयांक एवढे गुण इतिहास विषयात मिळवावे लागतील. तर पुढील दोन वर्षे विविध कौशल्यांचे शिक्षण घेऊन ८० श्रेयांक जमा करू शकेल. त्यामुळे पदवी होताना विद्यार्थ्याकडे विषयासोबतच उद्योगांची गरज असलेल्या कौशल्यांचेही ज्ञान असेल. त्यातून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीला लागेल.