५० टक्के इमारतींची दुरुस्ती शक्य
By Admin | Updated: June 2, 2015 04:49 IST2015-06-02T04:49:51+5:302015-06-02T04:49:51+5:30
अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींच्या यादीमधील ५० टक्के इमारती छोट्या-मोठ्या दुरुस्तीने वाचविणे शक्य असल्याचा अहवाल पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने (टॅक)

५० टक्के इमारतींची दुरुस्ती शक्य
शेफाली परब-पंडित, मुंबई
अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींच्या यादीमधील ५० टक्के इमारती छोट्या-मोठ्या दुरुस्तीने वाचविणे शक्य असल्याचा अहवाल पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने (टॅक) दिला आहे़ यामुळे डोक्यावरचे छप्पर
हिरावले जाण्याच्या विचाराने धास्तावलेले लाखो रहिवासी अखेर टेन्शनमुक्त झाले आहेत़ मात्र या अहवालामुळे स्ट्रक्चरल आॅडिटच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी म्हाडा आणि महापालिकेमार्फत मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात येते़ या वर्षी ५४२ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत़ यामध्ये खासगी, शासकीय, म्हाडा आणि महापालिका इमारतींचा समावेश आहे़ पावसाळ्यापूर्वी या इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीस बजाविण्यास सुरुवात झाली आणि लाखो रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली़
मात्र टॅक समितीपुढील सुनावणीत ५० टक्के इमारतींची दुरुस्ती विभाग पातळीवर शक्य असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ यास दुजोरा देताना धोकादायक व अतिधोकादायक अशा सुमारे एक हजार इमारतींच्या स्थैर्यतेवर सुनावणी झाली़ यापैकी ५० टक्के अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची दुरुस्ती शक्य असल्याचे आढळून आले़ याबाबत संबंधित विभाग कार्यालयांना सूचित करण्यात आल्याचे, या समितीचे अध्यक्ष व संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले़