पाताळगंगेत ५० नवे कारखाने
By Admin | Updated: March 10, 2015 22:27 IST2015-03-10T22:27:20+5:302015-03-10T22:27:20+5:30
पायाभूत सुविधांचा त्याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दाखविण्यात आलेल्या अनुकूलतेमुळे रसायनी पाताळगंगा एमआयडीसीत अतिरिक्त उद्योग

पाताळगंगेत ५० नवे कारखाने
मोहोपाडा : पायाभूत सुविधांचा त्याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दाखविण्यात आलेल्या अनुकूलतेमुळे रसायनी पाताळगंगा एमआयडीसीत अतिरिक्त उद्योग येऊ लागले आहेत. याठिकाणी दोनशेपेक्षा जास्त कारखाने नव्याने येणार आहेत. यापैकी पन्नास कारखानदारांना मंजुरी आणि भूखंड देण्यात आले आहेत.
रसायनी परिसरात शासनाने जमीन संपादित करून पाताळगंगा येथे औद्योगिक वसाहत विकसित केली. याठिकाणी एकूण ६९ कारखाने असून यात धागानिर्मिती, फार्मा आदी कंपन्या आहेत. इतर लहान-मोठे औद्योगिक प्रकल्प सुरू असून चांगल्या स्थितीत आहेत. या उद्योगांवर आधारित काही लघुउद्योगही परिसरात सुरू आहेत.
रसायनी हा परिसर मुंबई-पुणे, मुंबई-गोवा महामार्गापासून जवळ आहे. दळणवळणाच्या दृष्टिकोनातून हा पट्टा चांगला असल्याने या भागात उद्योग थाटण्यात अनेक उद्योजकांनी समर्थता दर्शवली आहे. पाताळगंगा एमआयडीसीत पायाभूत सुविधांचा विकास करून लूक बदलल्याने उद्योगांना चालना देणाऱ्या अनुकूल वातावरणामुळे अधिकाधिक उद्योगधंदे येऊ लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात कराडे, कासप, चावणे, जांभिवली, सारसई आदी गावांचा समावेश होत आहे. अतिरिक्त पाताळगंगा एमआयडीसीत एकूण पंधरा किमी लांबीचे रस्ते असून त्यांचे काम पूर्णत्वास आल्याचे उपअभियंता श्रीकांत राऊत यांनी सांगितले. येथील उद्योगांमुळे स्थानिकांनाही कामे मिळणार असून तरुणांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.