काविळीचे ४०० रुग्ण
By Admin | Updated: February 16, 2015 22:33 IST2015-02-16T22:33:10+5:302015-02-16T22:33:10+5:30
काविळीची साथ रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी दिली.

काविळीचे ४०० रुग्ण
खोपोली : शहरात काविळीच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नगरपरिषद प्रशासनाची झोप उडाली आहे. काविळीची साथ रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी दिली.
खोपोलीत गेल्या दोन महिन्यांत ४०० हून अधिक जणांना काविळीची लागण झाली. अजूनही रोज चार-पाच नवीन रूग्णांना कावीळ झाल्याचे दिसून आले. शहराच्या सर्वच भागात याचा प्रादुर्भाव असला तरी लक्ष्मीनगर, विहारी, रहाटवडे, सिध्दार्थनगर, प्रकाशनगर, साईबाबानगर या परिसरात काविळीच्या रूग्णांची संख्या जास्त आहे. पिण्याच्या पाण्याच्या लाइन्स या ३०-३५ वर्षे जुन्या आणि अनेक ठिकाणी त्या गटारांतून गेलेल्या आहेत. या पाइपलाइन्स कोठे लिक तर नाहीत ना, याची मायक्रो लेवलने तपासणी करण्याचे कामही सुरू असल्याचे मसुरकर यांनी सांगितले. नगरपरिषद रूग्णालयात काविळीसाठी इंजेक्शन आणि औषधे मोफत देणार असल्याची घोषणाही केली तसेच रक्त तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पिण्याच्या पाण्याचे अनेक ठिकाणचे नमुने अलिबाग, पनवेल येथे पाठविण्यात आले. मुख्याधिकारी दीपक सावंत यांनी या परिसरातील बोअरवेल्समध्येही नगरपरिषदेतर्फे जंतुनाशके टाकण्यात आल्याची माहिती दिली.
अनेक रूग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी अलिबाग येथे पाठविण्यात आले होते. त्यानुसार दूषित पाण्यामुळेच कावीळ होत असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी केले. (वार्ताहर)
पिण्याच्या पाण्याच्या लाइन्स या ३०-३५ वर्षे जुन्या असल्याने या पाइपलाइनमध्ये लिकेज झाल्यानेच दूषित पाणीपुरवठा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नागरिक या प्रकाराने भयग्रस्त आणि त्रस्त झाले आहेत. यावर वेळीच आळा घालण्याची मागणी नागरिकांच्यावतीने केली जात आहे.
पिण्याचे पाणी हेच काविळीच्या प्रसारात महत्त्वाचे असल्याने पिण्याचे पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले जात आहे. पाणी पूर्णत: उकळून नंतरच त्याचा वापर केला जावा अशा सूचना केल्या जात असून याद्वारे फैलावणाऱ्या काविळीला वेळीच आवर घालणे शक्य होणार आहे.
नगरपरिषद रूग्णालयात कावीळीसाठी इंजेक्शन आणि औषधे मोफत देणार असल्याची घोषणाही केली गेली असोन रक्ताच्या तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकंदरच आरोग्य विभागही यासाठी कामाला लागला असून सर्वपरीने तत्परता दाखविली जाते.